मुंबई | प्रतिनिधी
शाळकरी मुलांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन राज्य सरकारने शाळा व महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी विधानसभेत ही घोषणा केली.
विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी हा मुद्दा उपस्थित केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व पाथर्डी परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे काही शाळकरी मुलांचे हृदयाचे ठोके वाढून मृत्यू झाल्याच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली.
यावर उत्तर देताना मंत्री झिरवाळ यांनी शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात एनर्जी ड्रिंक्सची विक्री होत असल्याची दखल घेत प्रशासनाला ५०० मीटरच्या आत अशा पेयांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले.
याच चर्चेदरम्यान आमदार राहुल कुल यांनी शाळा परिसरात ‘फ्लेवर पान’च्या नावाखाली अंमली पदार्थांची विक्री तसेच फ्लेवर मिल्कच्या नावाखाली भेसळयुक्त पेये विकली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
मंत्री झिरवाळ यांनी या मागणीची दखल घेत वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास मोहीम सुरू असल्याची माहिती दिली. फ्लेवर पानांच्या नावाखाली होणारी अंमली पदार्थांची विक्री आणि भेसळयुक्त पेयांचीही सखोल चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कॅफिनच्या प्रमाणावरही नियंत्रण
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या नियमांनुसार कॅफिनयुक्त पेयांमध्ये प्रति लिटर १४५ ते ३०० मिलिग्रॅम कॅफिनची मर्यादा बंधनकारक आहे. एप्रिल २०२५ ते मे २०२६ या कालावधीत तपासण्यात आलेल्या ११५ एनर्जी ड्रिंक्सच्या नमुन्यांपैकी काही नमुने निकृष्ट दर्जाचे व चुकीच्या लेबलिंगचे आढळले असून संबंधितांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई सुरू असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली.





