पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यावरणीय विकासासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या ‘नमामी इंद्रायणी’ (इंद्रायणी नदी सुधार) प्रकल्पाचे भूमिपूजन येत्या ८ जुलै २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत देण्यात आली. दरम्यान, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिल्याने प्रत्यक्ष कामाचा मार्गही मोकळा झाला आहे.
पवना थेट जलवाहिनी प्रकल्पाच्या निमित्ताने विधान भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन दि.८ जुलै रोजी करु, असे आश्वासित केले आहे. विशेष म्हणजे, राज्यातील लाखो वारकऱ्यांचा मेळा असलेल्या आषाढी वारी पाखली सोहळ्याचे प्रस्थान याच दिवशी होणार आहे.
केंद्र सरकारच्या अमृत २.० योजनेअंतर्गत सुमारे ४३०.७५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे इंद्रायणी नदीचे प्रदूषण कमी करणे, जलगुणवत्ता सुधारणे, नदीकाठाचे संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि नागरिकांसाठी पर्यावरणपूरक नदीकिनारा विकसित करण्याचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. शहराच्या पर्यावरणीय भविष्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, आमदार महेश लांडगे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला आता मूर्त स्वरूप मिळत आहे.
महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत या प्रकल्पासाठी आठ निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी तीन निविदा तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरल्यानंतर आर्थिक छाननी करण्यात आली. त्यामध्ये मे. एल.सी. इन्फ्रा प्रा. लि. यांची सुधारित निविदा सर्वात लाभदायक ठरली. अंदाजित खर्चापेक्षा सुमारे तीन टक्के कमी दराने कंपनीने काम करण्याची तयारी दर्शविल्यामुळे महापालिकेच्या निधीची बचत होण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण कामाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.





