पुणे, मे 2026 : तंबाखूजन्य पदार्थ हे आरोग्यासाठी हानीकारक आहेत,हे सर्वज्ञात असून देखील त्याचे प्रमाण कमी होत नाही.स्वत:च्या आरोग्याची हानी करून घेण्यापेक्षा वेळीच अशा तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन बंद करणे हाच कर्करोग टाळण्याच्या दिशेने सर्वोत्तम उपाय ठरू शकतो,असे मत तज्ञांनी व्यक्त केले.
दरवर्षी 31 मे रोजी वर्ल्ड नो टोबॅको डे किंवा जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने जनजागृती केली जाते.
नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर येथील वरिष्ठ कर्करोग तज्ञ डॉ.मिनिष जैन म्हणाले की,हेड ॲन्ड नेक कॅन्सर (डोके आणि मानेच्या भागात होणारा कर्करोग) असलेल्या रूग्णांचे प्रमाण कमी झालेले नाही.जगभरात सर्व कर्करोगांपैकी 30 ते 40 टक्के कर्करोग हे तंबाखूजन्य पदार्थांमुळे होतात.शहरी भागात जीवनशैलीशी निगडित कर्करोगाचे प्रमाण वाढत असताना ग्रामीण भागात तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण इतरी कर्करोगांपेक्षा जास्त आहे.यामध्ये पुरूषांचे प्रमण अधिक दिसून येते.त्यातील सर्वांत मोठी समस्या म्हणजे हे रूग्ण कर्करोगाच्या पुढील टप्प्यात तपासण्यांसाठी येतात.
फुफ्फुसाचा कर्करोग होण्याच्या प्रमाणामध्ये सुमारे 85 टक्के हे धुम्रपानाशी निगडित आहे.जगभरात कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 25 टक्के हे फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होतात. त्यामुळे याबाबत जागरूकता निर्माण केल्यास आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन थांबवल्यास यामुळे होणारे मृत्यू आपण लक्षणीयरित्या कमी करू शकतो.
डॉ.जैन पुढे म्हणाले की,कर्करोगाच्या उपचारांमध्ये गेल्या काही वर्षात लक्षणीय सुधारणा झाल्या असून इम्युनो थेरपी,टार्गेटेड थेरपी व चांगले औषधोपचार उपलब्ध आहेत.मात्र हा कर्करोग टाळण्याजोगा आहे आणि त्यामुळेच त्याच्या प्रतिबंधावर आपण लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.





