सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद!
सातारा – लाखो वर्षांपासून हिंदु धर्माची आधारशीला असलेली मंदिरे ‘सेक्युलर’वादाच्या नावाखाली विविध आघात सहन करत आहेत. मंदिरांचे सरकारीकरण, सरकारीकरण झालेल्या मंदिरात भ्रष्टाचार, मंदिरांची भूमी बळकावणे, तिरुपती बालाजीसारख्या मंदिराच्या प्रसादात भेसळ, मंदिरांच्या भूमीवर ‘वक्फ’चे वाढते अतिक्रमण अशा समस्यांच्या निराकरणासाठी मंदिर महासंघ कार्यरत आहे. त्या दृष्टीने एकूणच अशा समस्यांवर व्यापक चर्चा व्हावी, मदिरांचे संघटन व्हावे, मंदिरांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी पुढाकार घेणे यांसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ, मुंबई येथील श्री जिवदानी देवी संस्था, श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमान २२ मार्चला सातारा येथील स्वराज मंगल कार्यालय, कोरोगाव रस्ता, सातारा येथे चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रभरातून १००० हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘मंदिर महासंघा’चे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. संजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेसाठी पू. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज,अधिवक्ता जनार्दन करपे, ‘मंदिर महासंघा’चे सातारा जिल्हा संयोजक श्री. शिवाजीराव तुपे, भुईंज महालक्ष्मी मंदिराचे श्री. गजानन भोसले, हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. हेमंत सोनावणे उपस्थित होते.
या वेळी शिवाजीराव तुपे म्हणाले ‘‘मंदिर महासंघाचे १७ हजारहून अधिक विश्वस्त, पुरोहित, धार्मिक संस्था, भक्त यांचे संघटन असून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक इ. राज्यांतील २ हजार ४०० हून अधिक मंदिरांत वस्रसंहिता लागू करण्यात आली आहे. मंदिर महासंघाने महाराष्ट्रातील मंदिरांची शेकडो एकर भूमी घोटाळेबाजांपासून वाचवली आहे. कर्नाटकात मंदिर महासंघाच्या विरोधामुळे मंदिरांकडून धन घेणारे ‘मंदिर अन् धर्मादाय संस्था कर सुधारणा विधेयक २०२४’ संमत होऊ शकले नाही. कर्नाटकातून गायब झालेल्या ४ हजार १७० मंदिरांच्या पुनर्भस्तित्वासाठी आंदोलन केले. यांसह मंदिरांच्या विविध प्रश्नांसाठी मंदिर महासंघ सातत्याने लढत आहे.’’
परिषदेला अनेक मान्यवरांची उपस्थिती !
श्री. हेमंत सोनवणे म्हणाले , ‘‘या परिषदेला राज्याचे फलोत्पादनमंत्री भरतसेठ गोगावले, जैन मंदिराचे श्री. गिरीश शहा, मंदिर क्षेत्रात कार्यरत लेखक-अभ्यास श्री. संदीप सिंह, श्रीक्षेत्र आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ महाराज, देहू-आळंदी येथील मंदिरांचे विश्वस्त, ११ मारुति मंदिरांचे विश्वस्त,‘मंदिर महासंघा’चे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांसह श्री अष्टविनायक मंदिरांचे विश्वस्त, महाराष्ट्रातील जोतिर्लिंग देवस्थानांचे विश्वस्त, सतानन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, संत पिठांचे प्रतिनिधी, अन्य मंदिरांचे विश्वस्त आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.’’
मंदिरांची सुरक्षा यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर परिषदेत चर्चा !
या मंदिर परिषदेत मान्यवरांचे मार्गदर्शन, तसेच मंदिरांशी निगडीत विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. यात मंदिरांची सुरक्षा, ‘मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे’, ‘मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे’, ‘वक्फ कायद्या’द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय’, ‘मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या परिसरात मद्य-मांस बंदी; दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार आदी विषयांवर चर्चा होणार आहे. ही परिषद केवळ निमंत्रितांसाठी असून यामध्ये सहभागी होण्यासाठी ७०२०३८३२६४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंदिर महासंघाने केले आहे.



