पुणे : पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गावर वाढत चाललेल्या वाहतूक ताणाच्या पार्श्वभूमीवर नेरळ–वांद्रे–शिरूर या पर्यायी मार्गाच्या विकासाला राज्य सरकारने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प मंजूर व्हावा यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार Amol Kolhe यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
उरण – कर्जत – नेरळ – वांद्रे – पाईट – शिरोली – पाबळ – मलठण – शिरूर या मार्गाचे काम प्राधान्याने हाती घ्यावे, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली होती. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या महत्त्वाच्या प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली.
फेब्रुवारी महिन्यात Mumbai–Pune Expressway वर आडोशी बोगद्याजवळ टँकर अपघात झाल्यानंतर जवळपास ३२ तास वाहतूक कोंडी झाली होती. गॅस गळतीमुळे महामार्ग बंद ठेवावा लागल्याने प्रवासी अनेक तास अडकून पडले होते. या घटनेनंतर खासदार कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्याकडे पर्यायी मार्गाची गरज अधोरेखित करत नेरळ ते शिरूर या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
नेरळ ते वांद्रे दरम्यानचा सुमारे २० किलोमीटरचा भाग पर्यावरणीय दृष्ट्या अतिसंवेदनशील असल्याने येथे घाटमार्ग विकसित करण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे. यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही खासदार कोल्हे यांनी दिले.
या प्रकल्पामुळे भविष्यात पुणे–मुंबई, मुंबई–छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई–सोलापूर या मार्गांमधील संपर्क अधिक सुलभ होईल तसेच विद्यमान महामार्गांवरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.
सह्याद्री पर्वतरांग कोकण आणि महाराष्ट्र पठार यांच्यामधील नैसर्गिक विभाजनरेषा असून या भागात अनेक घाटमार्ग आहेत. मात्र माळशेज घाट आणि बोरघाट या दोन घाटांमधील अंतर सुमारे ६० किलोमीटर आहे. या दोन घाटांदरम्यान पर्यायी घाटमार्ग विकसित झाल्यास वाहतुकीसाठी एक सक्षम पर्याय उपलब्ध होईल. यामुळे पुणे–शिरूर, पुणे–नाशिक महामार्ग तसेच तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावरील वाहतुकीची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. विशेषतः औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या चाकण परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास दिलासा मिळेल.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी दिल्याबद्दल खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.





