जान्हवी किल्लेकर – ओम यादव यांनी पुन्हा जिंकले नेटकऱ्यांचे मन; कॅन्सरग्रस्त चिमुकल्याला दिला आशेचा हात

मुंबई : सोशल मीडियावर लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि अभिनेता ओम यादव या जोडीने पुन्हा एकदा आपल्या संवेदनशील कृतीतून नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. बिग बॉस’मधून घराघरात पोहोचलेली जान्हवी आणि ‘कॉमेडी तडका फोम मिनिस्टर’मुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेला ओम यादव यांनी कॅन्सरशी झुंज देणाऱ्या १२ वर्षीय सुबोधची भेट घेऊन माणुसकीचा सुंदर आदर्श घालून दिला.

टाटा मेमोरियलमध्ये आशेची किरणे

गेल्या दोन वर्षांपासून सुबोध कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढतो आहे. मुंबईतील Tata Memorial Hospital येथे उपचार घेत असताना तो जान्हवी आणि ओम यांच्या इन्स्टाग्राम व यूट्यूबवरील विनोदी आणि नृत्याचे व्हिडिओ नियमित पाहायचा. “हे व्हिडिओ पाहिले की मला बरं वाटतं,” असे तो आई-वडिलांना सांगायचा. त्यांच्या व्हिडिओमुळे काही क्षणांसाठी तरी त्याचे दुःख हलके व्हायचे.

एका फोनवर दिला होकार

सुबोधने त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली; मात्र ही भेट शक्य होईल का, याबाबत कुटुंब साशंक होते. अखेर सोशल मीडियाच्या माध्यमातून ओम यादव यांच्याशी संपर्क साधण्यात आला. सुबोधची कथा कळताच ओम यांनी क्षणाचाही विलंब न करता भेटीस होकार दिला. त्यांनी जान्हवी यांनाही याबाबत सांगितले आणि दोघांनी वेळ काढून सुबोधला सरप्राईज भेट देण्याचे ठरवले.

या भेटीच्या आदल्या दिवशी ओम यादव छत्रपती संभाजीनगर येथे कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री उशिरा कार्यक्रम आटोपल्यानंतर जवळपास ५०० किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबई गाठली. जान्हवी यांनी आपल्या पोस्टमध्ये ओम यांच्या या संवेदनशीलतेचे कौतुक करत, “सर्वांना हसवणारा ओम तेवढाच हळवा आणि माणुसकी जपणारा आहे,” असे म्हटले.

दोन तासांचे हास्य, संवाद आणि अश्रू

हॉस्पिटलच्या कक्षात दोघे पोहोचताच सुबोधच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. चेहऱ्यावर थकवा असला तरी त्याचे मनापासून उमटलेले हास्य उपस्थित सर्वांना भावूक करून गेले. जवळपास दोन तास गप्पा, खेळ, विनोद आणि संवाद सुरू होते. स्वतःच्या भावना आवरून सुबोधला फक्त हसवायचे, असा निर्धार या दोघांनी केला होता.

जान्हवी यांनी लिहिले, “आपण छोट्या गोष्टींवर तक्रार करतो; पण हा छोटासा योद्धा प्रत्येक दिवस जगण्यासाठी लढतोय आणि तरीही हसतोय. त्याने आम्हाला शिकवले की जिद्द आणि आशा कधीही सोडायची नसते.”

समाजाभिमुख भूमिका

गेल्या वर्षभरात ओम–जान्हवी या जोडीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आपली लोकप्रियता टिकवून ठेवली आहे. त्यांच्या शोमध्ये सहभागी झालेले अनेक राजकीय उमेदवार निवडून आल्यानेही ही जोडी चर्चेत होती. मात्र, या भेटीमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा संवेदनशील आणि सामाजिक पैलू समोर आला आहे.

दोघांनीही पुढील काळात अशा गंभीर आजारांशी झुंज देणाऱ्या आणखी रुग्णांना भेटून त्यांना आनंदाचे क्षण देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या कृतीचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून, “स्टारडमपेक्षा माणुसकी मोठी” अशी प्रतिक्रिया चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.

ही भेट केवळ एका चाहत्याची इच्छा पूर्ण करणारी नव्हती; तर आशा, जिद्द आणि माणुसकी यांची जिवंत जाणीव करून देणारा हृदयस्पर्शी क्षण ठरली.