BIG NEWS : खासगी विमान कोसळून सात जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : झारखंडची राजधानी रांची येथील बिरसा मुंडा विमानतळावरून दिल्लीकडे निघालेल्या खासगी चार्टर एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात झाला असून चालक दलासह एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. हे विमान चतरा जिल्ह्यातील कसरिया पंचायत परिसरात कोसळल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
घटनेनंतर एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) च्या माहितीनुसार, रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडचे बीचक्राफ्ट C90 हे विमान 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.11 वाजता रांचीहून दिल्लीकडे एअर अँब्युलन्स उड्डाणासाठी निघाले होते. उड्डाणानंतर काही वेळात कोलकाता एटीसीशी संपर्क झाला; मात्र सायंकाळी 7.34 वाजता दक्षिण-पूर्व वाराणसी परिसरात विमानाशी रडार आणि रेडिओ संपर्क तुटला. त्यानंतर विमानाशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही.

सिमरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खासियातू करमटांड जंगल परिसरात संशयित धातूचा मलबा आढळून आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा एअर अँब्युलन्सचा अवशेष असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून घटनास्थळी प्रोपेलर आणि इंजिनचे तुकडे दिसून आले आहेत.
वाराणसी एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या माहितीनुसार, VT-AJV हे विमान त्यांच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर संपर्काबाहेर गेले. पायलटची शेवटची बातचीत कोलकाता क्षेत्रातील ATCशी (VHF 132.25 MHz) झाली होती. संपर्क तुटल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने रात्री 8.05 वाजता रेस्क्यू को-ऑर्डिनेशन सेंटर (RCC) सक्रिय करण्यात आले आणि शोध-बचाव मोहीम सुरू करण्यात आली.
जिल्हा प्रशासन, पोलिस आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. अपघातामागील तांत्रिक बिघाड, हवामान किंवा इतर कारणांचा तपास सुरू असून AAIB कडून सविस्तर अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे.









