BIG NEWS : महत्त्वाची कामे आजच उरकून घ्या; उद्या भारत बंद; तुमच्या शहरात काय बंद राहणार? ‘या’ १० सेवांवर होऊ शकतो थेट परिणाम

BIG NEWS : महत्त्वाची कामे आजच उरकून घ्या; उद्या भारत बंद; तुमच्या शहरात काय बंद राहणार? ‘या’ १० सेवांवर होऊ शकतो थेट परिणाम

केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी देशभरात ‘भारत बंद’चे आवाहन करण्यात आले आहे. दहा प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांनी एकत्र येत हा संप पुकारला असून शेतकरी संघटनांनीही त्याला पाठिंबा दर्शवला आहे. आयोजकांच्या दाव्यानुसार सुमारे ३० कोटी कामगार या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या आंदोलनाचा मुख्य मुद्दा म्हणजे केंद्र सरकारने लागू केलेले चार नवीन कामगार कायदे (लेबर कोड्स). सरकारच्या मते हे कायदे श्रमकायद्यांचे एकत्रीकरण करून उद्योगसुलभता वाढवण्यासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी उपयुक्त ठरणार आहेत. मात्र कामगार संघटनांचे म्हणणे आहे की या कायद्यांमुळे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे सोपे होईल, कंत्राटीकरण वाढेल आणि संघटनात्मक हक्क कमकुवत होतील. नोकरीची सुरक्षितता, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा आणि सामूहिक हक्कांवर परिणाम होईल, अशी त्यांची भीती आहे. वाढती बेरोजगारी, महागाई आणि खासगीकरणाच्या धोरणांविरोधातही हा बंद पुकारण्यात आल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

काय बंद राहू शकते?

  • सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता

  • मोठ्या शहरांतील बाजारपेठा, दुकाने आणि औद्योगिक आस्थापनांवर परिणाम

  • काही सरकारी कार्यालयांतील उपस्थिती कमी राहण्याची शक्यता

  • रस्ते रोको आंदोलनांमुळे बस सेवा आणि स्थानिक वाहतूक विस्कळीत होऊ शकते

  • काही ठिकाणी शाळा व महाविद्यालये खबरदारी म्हणून बंद ठेवली जाऊ शकतात

काय सुरू राहण्याची शक्यता?

  • रुग्णालये, औषध दुकाने आणि रुग्णवाहिका सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न

  • विमानसेवा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहण्याची शक्यता

  • एटीएम सेवा उपलब्ध राहू शकते; मात्र रोख रकमेची उपलब्धता तपासणे आवश्यक

  • बहुतांश खासगी कार्यालये सुरू राहतील, तरी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर परिणाम होऊ शकतो

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

  • बँकिंग व शासकीय कामे शक्यतो आजच पूर्ण करून घ्यावीत

  • प्रवासाची योजना करताना स्थानिक वाहतूक व्यवस्थेची अद्ययावत माहिती घ्यावी

  • अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे

हा बंद केवळ एका दिवसापुरता असला तरी कामगार कायदे, रोजगार, महागाई आणि खासगीकरण या मुद्द्यांवर पुढील काळातही राजकीय व आर्थिक पातळीवर चर्चा रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याच्या भारत बंदचा परिणाम केवळ वाहतूक किंवा सेवा बंदीपुरता मर्यादित न राहता व्यापक चर्चेचा विषय ठरणार आहे.