पुणे, १६ जून २०२६ : पुणे हे भारतातील ‘ग्रीन बिल्डिंग’ (पर्यावरणपूरक इमारत) क्षेत्रातील एक आघाडीचे शहर म्हणून उदयास आले आहे. सध्या महाराष्ट्रात पुणे दुसऱ्या क्रमांकावर असून, येथे १,४८१ नोंदणीकृत ग्रीन बिल्डिंग प्रकल्प (एकूण २.३४ अब्ज चौरस फुटांहून अधिक क्षेत्रफळ) आणि ४५० प्रमाणित प्रकल्प (१.०९ अब्ज चौरस फुटांहून अधिक ग्रीन बिल्ट-अप क्षेत्रफळ) आहेत. ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’च्या (सीआयआय) ‘इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल’ने (आयजीबीसी) ‘पुणे २०४०: भारताचे आघाडीचे हरित आणि हवामान-सज्ज शहर उभारणे’ (पुणे २०४०: बिल्डिंग इंडियाज लिडिंग ग्रीन क्लायमेट रेडी सिटी) या संकल्पनेवर आधारित ‘आयजीबीसी ग्रीन पुणे समिट २०२६’ मध्ये ही आकडेवारी सादर केली.
या प्रगतीमध्ये पुण्याचा वाटा महत्त्वपूर्ण आहे; येथील नोंदणीकृत प्रकल्पांमध्ये विविध क्षेत्रांचा समावेश आहे, ज्यामध्ये ५८१ व्यावसायिक प्रकल्प, ७२३ निवासी प्रकल्प, ७० औद्योगिक आणि लॉजिस्टिक प्रकल्प, २४ ‘बिल्ट एन्व्हायर्नमेंट’ (निर्मित पर्यावरण) प्रकल्प, ६० वाहतूक पायाभूत सुविधा प्रकल्प आणि २३ ‘नेट झिरो’ प्रकल्पांचा समावेश आहे. ही आकडेवारी शाश्वत विकासाप्रती पुण्याची दृढ बांधिलकी आणि हरित व हवामान-पूरक पायाभूत सुविधांच्या विकासातील त्याचे वाढते नेतृत्व दर्शवते.
या परिषदेच्या उद्घाटन सत्रास महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्यमापन विभागाचे संचालक श्री. जितेंद्र भोपळे; ‘के. रहेजा कॉर्प’चे कमर्शियल रिअल इस्टेट विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. विनोद रोहिरा; आयजीबीसी ग्रीन एज्युकेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. पूर्वा केसकर; आयजीबीसी पुणे चॅप्टरचे अध्यक्ष श्री. हृषिकेश मांजरेकर आणि आयजीबीसी पुणे चॅप्टरचे सह-अध्यक्ष श्री. तुषार येवले उपस्थित होते. तसेच, या कार्यक्रमास धोरणकर्ते, नगररचनाकार, विकासक, वास्तुविशारद, शाश्वत विकास क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि ‘बिल्ट एन्व्हायर्नमेंट’ क्षेत्रातील इतर संबंधित घटकांनीही हजेरी लावली.
या परिषदेत उत्कृष्ट ग्रीन बिल्डिंग प्रकल्पांचा गौरव करण्यात आला आणि शाश्वत विकासाला चालना देण्यातील त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली. सखोल चर्चा आणि सहयोगाच्या माध्यमातून, ‘ग्रीन पुणे समिट’ने भागीदारी बळकट करण्यासाठी, नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि २०४० पर्यंत भारताचे आघाडीचे हरित व हवामान-सज्ज शहर बनण्याच्या पुण्याच्या ध्येयाला गती देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.





