प्रतिनिधी – मानस, बीड : सोशल मीडियावर जनतेच्या समस्या सोडवणारा, पारदर्शक प्रशासनाचा संदेश देणारा अधिकारी अशी प्रतिमा निर्माण केलेले अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अवैध वाळू उपसा प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी तसेच संबंधित यंत्रसामग्री आणि वाहनांवर जप्तीची कारवाई न करण्याच्या मोबदल्यात तहसीलदार विजय चव्हाण यांनी मासिक हप्त्याच्या स्वरूपात पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराकडून पोकलेन मशीन आणि सहा हायवा वाहने सुरळीत सुरू ठेवण्यासाठी तब्बल ७ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या संदर्भात तक्रारदाराने बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तडजोडीनंतर ६ लाख ४० हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. शनिवारी सायंकाळी लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी विजय चव्हाण यांना ताब्यात घेतले.
सोशल मीडियावर होती वेगळी प्रतिमा
विजय चव्हाण हे सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर ३२ हजारांहून अधिक फॉलोअर्स असून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रश्न सोडवणे, जमिनीचे वाद निकाली काढणे, सरकारी योजनांची माहिती देणे आणि नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही केल्याचे व्हिडिओ ते नियमितपणे शेअर करत असत.
नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधल्यानंतर त्यांच्या समस्या सोडवल्याचे स्क्रीनशॉट आणि अनुभवही ते वारंवार पोस्ट करत होते. त्यामुळे जनतेमध्ये त्यांची एक सकारात्मक आणि लोकाभिमुख अधिकारी अशी प्रतिमा निर्माण झाली होती.
अटकेनंतर उलटसुलट प्रतिक्रिया
एसीबीच्या कारवाईनंतर विजय चव्हाण यांच्या प्रतिमेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर ज्यांचे कौतुक केले जात होते, त्यांच्याविरोधात आता टीकेची लाट उसळली आहे. प्रामाणिक प्रशासनाचा संदेश देणाऱ्या अधिकाऱ्यावरच लाचखोरीचे गंभीर आरोप झाल्याने या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, एसीबीकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.





