पुणे, दि. १७ : इंडिया आघाडीच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार सत्ताधारी पक्षात प्रवेश करत असतील, तर तो मतदारांच्या जनादेशाशी विश्वासघात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी अशा खासदारांच्या घरांसमोर तीव्र निषेध आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात तिवारी यांनी म्हटले आहे की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने संविधानाचे संरक्षण, लोकशाही मूल्यांचे जतन आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात स्पष्ट जनादेश दिला होता. या पार्श्वभूमीवर विरोधी आघाडीच्या पाठिंब्यावर निवडून आलेले खासदार पक्षांतर करत असतील, तर ते मतदारांचा विश्वासघात करणारे कृत्य ठरेल.
तिवारी यांनी दावा केला की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खासदारसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून देशातील जनतेने सशक्त विरोधी पक्षाला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे, भाजपला अपेक्षित यश मिळाले नसून केंद्रातील सरकार हे मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर सत्तेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यातील संभाव्य पक्षांतराच्या चर्चांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, इंडिया आघाडीतील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे जनतेच्या कौलाच्या विरोधात जाऊन पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील.
पक्षांतर करणाऱ्या खासदारांच्या घरांसमोर निषेध आंदोलने करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा देत तिवारी यांनी लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी संघर्ष सुरूच राहील, असेही सांगितले.





