हिंदूंच्या धार्मिक परंपरेवर गदा आणणारा पुरातत्व विभागाचा ‘तुघलकी’ निर्णय तत्काळ रद्द करा !
पुणे : गंज पेठेतील ऐतिहासिक ‘महात्मा फुले वाडा’ स्मारकासमोरील वटवृक्षाच्या पूजनावर पुरातत्व विभागाने घातलेली बंदी हा हिंदू महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर केलेला मोठा आघात आहे. या अन्यायकारक निर्णयाचा “हिंदु जनजागृती समितीने” तीव्र निषेध केला असून, पुरातत्व विभाग आणि मनपा आयुक्त कार्यालयात निवेदन देऊन ही बंदी उठवण्याची मागणी केली आहे. हे निवेदन हिंदुराष्ट्र समन्वय समिती, सुराज्य अभियान,
रणरागिणी शाखा यांच्या शिष्ठमंडळाने दिले. यावेळी हिंदुराष्ट्र समन्वय समितीचे श्री. सचिन घुले, रणरागिणी शाखेच्या कु.क्रांती पेटकर, सुराज्य अभियानचे सुरेंद्र महाजन, हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील तसेच अन्य संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
‘या विषयासंदर्भात दोन्ही विचारांच्या संघटनांची निवेदने आलेली आहेत. त्यातील सूत्रे आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवतो. या संदर्भात अजून अंतिम निर्णय झालेला नाही. दोन्ही बाजूंचा सविस्तर विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल’, असे पुरातत्व विभागाचे श्री. हेमंत गोसावी यांनी सांगितले.
निवेदनातील ठळक मुद्दे !
निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संविधानाचे अनुच्छेद २५ आणि २६ प्रत्येक नागरिकाला आपापल्या धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेली वटपौर्णिमेची परंपरा रोखणे हे या मूलभूत अधिकारांचे उघड उल्लंघन आहे. राज्यातील गड-किल्ले आणि संरक्षित स्मारकांवर झालेली अनधिकृत मजार, थडगी आणि बांधकामे हटवण्याबाबत पुरातत्व विभाग पूर्णतः निष्क्रीय आहे. मात्र, परंपरेने आणि शांततेत चालणाऱ्या हिंदूंच्या पूजेला विरोध करण्यासाठी हा विभाग कमालीची तत्परता दाखवत आहे. हा प्रशासनाचा उघड दुजाभाव आहे. केवळ झाडाला प्रदक्षिणा घातल्याने ऐतिहासिक वास्तूला हानी पोहोचते, असा कोणताही तांत्रिक आधार किंवा अहवाल पुरातत्व विभागाकडे नाही. असे असताना अशा प्रकारे सणांवर बंदी घालणे हे लोकशाहीला घातक आहे.
ज्यांनी महिलांच्या सन्मानासाठी आयुष्य वेचले, त्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याच स्मारकासमोर महिलांना पूजेपासून रोखणे, हा त्यांच्या महान कार्याचा अपमान आहे. पुरातत्व विभाग आपल्या मूळ जबाबदाऱ्या (स्मारकांचे जतन) सोडून धार्मिक विधींमध्ये अडथळे आणण्याचे काम करत आहे.
निवेदनाद्वारे समितीने केलेल्या प्रमुख मागण्या
१. वटपौर्णिमा पूजनावर बंदी घालणारा आदेश प्रशासनाने कोणत्याही अटीविना त्वरित मागे घ्यावा.
२. येत्या २९ जून २०२६ रोजी महिलांना वटवृक्षाचे पूजन करण्यासाठी रीतसर परवानगी द्यावी.
३. पूजेच्या वेळी कोणताही तणाव निर्माण होऊ नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करावा.
या संदर्भात प्रशासनाने योग्य पावले न उचलल्यास, हिंदु जनजागृती समिती समस्त भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांना सोबत घेऊन राज्यव्यापी आंदोलन छेडेल, असा इशारा समितीने दिला आहे.





