पुणे, मे,२०२६: गेल्या काही वर्षांत मराठी सिनेमाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली असून जागतिक स्तरावर आपला अमीट ठसा उमटवला आहे. या समृद्ध आणि आशयघन कथानकाकडे आकर्षित होऊन बॉलीवूडमधील अनेक नामांकित कलाकार आणि चित्रपट निर्माते मराठी चित्रपटसृष्टीकडे वळत आहेत. याच लाटेत सामील होऊन ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक के. पप्पू यांचे सुपुत्र आणि दिग्गज दिग्दर्शक, निर्माते राज कंवर यांचे पुतणे, अभिषेक कंवर एका सशक्त विषयाचा सोबतीने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाले आहेत. नेहमीच्या पारंपरिक मार्गापासून दूर जाऊन त्यांनी आपल्या दिग्दर्शनाचा प्रवास बॉलीवूड चित्रपटाऐवजी मराठी चित्रपटापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आगामी ‘जनक’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पुणे आणि भोरच्या सुंदर परिसरामध्ये अवघ्या १९ दिवसांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले.
‘आरटीबी फिल्म्स’ या बॅनरखाली निर्मित ‘जनक’ चित्रपटाच्या माध्यमातून अभिषेक कंवर हे निर्माता आणि दिग्दर्शक अशा दोन्ही भूमिकांतून मराठी चित्रपटसृष्टीत भव्य पदार्पण करत आहेत. त्रिलोक सिंग राजपूत यांनी या चित्रपटाचे सह-निर्माते म्हणून काम पाहिले आहे. या चित्रपटात सायली संजीव, अविनाश नारकर, अनुष्का मनीष पिंपुतकर आणि सुरेश विश्वकर्मा यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा ओंकार भस्मे, अभिषेक कंवर आणि राकेश नामदेव शिर्के यांनी मिळून लिहिली आहे. चोख नियोजन, उत्तम समन्वय आणि संपूर्ण टीमच्या अहोरात्र मेहनतीमुळे केवळ १९ दिवसांत संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्याचा अद्भूत पराक्रम टीमने करून दाखवला आहे.
‘माझ्या दिग्दर्शनाच्या पदार्पणासाठी आघाडीच्या बॉलीवूड कलाकारांना घेऊन मोठ्या बजेटचा हिंदी चित्रपट दिग्दर्शित करण्याची संधी होती. मात्र, जनकची कथा माझ्याकडे आली, तेव्हा मला माहीत होते की मला हीच कथा निवडायची आहे आणि माझा प्रवास मराठी चित्रपटसृष्टीतूनच सुरू करायचा आहे. मला पूर्ण खात्री होती, की हे कथानक मराठी भाषा आणि संस्कृतीमध्ये अधिक प्रभावी आणि वास्तववादी वाटेल,’ असे अभिषेक कंवर म्हणाले. ‘जनक’ हा एका अत्यंत संवेदनशील आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर आधारित असून, तो नक्कीच लोकांच्या हृदयाला स्पर्श करेल. सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे एखाद्या निष्पाप व्यक्तीची कशी नाहक बदनामी होऊ शकते आणि त्याचे कौटुंबिक आयुष्य कसे उद्ध्वस्त होऊ शकते, हे दाखवून हा चित्रपट डिजिटल युगातील कठोर वास्तव प्रभावीपणे मांडतो. सत्य घटनांवर प्रेरित असलेला हा थरारक कोर्टरूम ड्रामा सर्वसामान्य जनतेला एक ठोस सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतो, असेही अभिषेक यांनी नमूद केले.
चित्रपटाच्या छायाचित्रणाची धुरा सुमेध मराठे यांनी सांभाळली असून, आदित्य कडतणे यांनी संगीत दिले आहे. सिद्धार्थ तातुस्कर यांनी प्रॉडक्शन डिझायनर म्हणून काम पाहिले आहे. चित्रीकरणाचा टप्पा वेगाने पूर्ण झाल्यानंतर, आता हा चित्रपट आपल्या पोस्ट प्रॉडक्शनच्या टप्प्यात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे.





