पुणे, मे २०२६ : अक्षय ऊर्जेबाबत देशभरात जनजागृती वाढवण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत, भारतातील अग्रगण्य एकात्मिक ऊर्जा संक्रमण समूहांपैकी एक असलेल्या अवादा ग्रुपने ‘अवादा भारत उदय यात्रा’ हा आपला प्रमुख उपक्रम पुण्यात राबविला. अवादा ग्रुपने या माध्यमातून नागरिक, स्थानिक समुदाय आणि विविध घटकांशी शाश्वत ऊर्जा आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत संवाद साधला.
८ मे २०२६ रोजी नोएडामधून या यात्रेला सुरुवात करण्यात आली. अक्षय ऊर्जा स्वीकार आणि शाश्वत जीवनशैली याबाबत तळागाळात जागरूकता निर्माण करणे, तसेच भारताच्या स्वच्छ आणि अधिक आत्मनिर्भर ऊर्जा भविष्याच्या दिशेने होणाऱ्या संक्रमणाला बळ देणे, हा या देशव्यापी जनजागृती मोहिमेचा उद्देश आहे.
विशेष डिझाइन केलेल्या या व्हॅनने आतापर्यंत उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या चार राज्यांसह नऊ शहरांमधून सुमारे १७१४ किमीचा प्रवास पूर्ण केला आहे. प्रत्यक्ष उपक्रम आणि जनसहभाग मोहिमांच्या माध्यमातून ही यात्रा थेट स्थानिक समुदायांशी संवाद साधत आहे.
पुण्यामध्ये या यात्रेला नागरिक, विद्यार्थी आणि स्थानिक संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सौर, पवन आणि जलविद्युत यांसारख्या अक्षय ऊर्जा उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये वाढत असलेली उत्सुकता आणि जागरूकता यावेळी स्पष्टपणे दिसून आली.
या उपक्रमाविषयी बोलताना अवादा ग्रुपचे अध्यक्ष विनीत मित्तल म्हणाले, “भारतात हरित ऊर्जेचा स्वीकार अधिक वेगाने वाढवण्याची हीच योग्य वेळ आहे. जागतिक स्तरावरील भू-राजकीय अनिश्चितता आणि जीवाश्म इंधन पुरवठा साखळीतील अडथळ्यांचा ऊर्जा बाजारपेठेवर परिणाम होत असताना, भारताचे अक्षय ऊर्जेकडे होणारे संक्रमण हे केवळ पर्यावरणाशी संबंधित प्राधान्य नसून ऊर्जा सुरक्षितता आणि आत्मनिर्भरतेसाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रवासातील निर्णायक टप्प्यावर भारत उभा आहे आणि पुढील टप्प्याला नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच चालना मिळणार आहे. ‘अवादा भारत उदय यात्रे’च्या माध्यमातून अक्षय ऊर्जा अधिक सुलभ, सर्वसामान्यांशी जोडलेली आणि प्रत्यक्ष कृतीत आणण्याजोगी बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जनजागृतीचे रूपांतर देशव्यापी चळवळीत करणे, हेच या उपक्रमामागील उद्दिष्ट आहे.”
पुण्यातील मुक्कामादरम्यान या यात्रेमध्ये विविध आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अक्षय ऊर्जेच्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले. तसेच, अक्षय ऊर्जेबाबत असलेल्या सर्वसामान्य गैरसमजांवर आधारित संवादात्मक सत्रांचे आयोजन करण्यात आले. नागरिकांना शाश्वत जीवनशैलीसाठी वैयक्तिक बांधिलकी व्यक्त करता यावी, यासाठी ‘डिजिटल ग्रीन प्लेज’ (डिजिटल हरित प्रतिज्ञा) घेण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली.





