अजून किती वर्ष सनातन संस्थेला आरोपी करत रहाणार? – सनातन संस्था
मुंबई : दाभोलकरांच्या खूनानंतर तत्कालीन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी तासाभरातच थेट हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडे बोट दाखवले आणि तपास त्या दिशेनेच चालू झाला. ‘प्लँचेट’चा वापर करून सनातन संस्थेचे नाव दाभोलकर (त्यांचा आत्मा!) घेत आहे, असे दाखवले जात होते, तर कधी तसे थेट आरोप दाभोलकरांचे कार्यकर्ते करत होते. हे सर्व चालू असतांना सनातन संस्था आणि तिच्या साधकांनी संपूर्ण तपासाला शांतपणे तोंड दिले. कधीही ‘तपासयंत्रणांना सहकार्य केले नाही’, असा आरोप संस्था किंवा संस्थेच्या साधकांवर झाला नाही. या पार्श्वभूमीवर वर्ष २०१५ ते २०२३ या काळात या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालू होता. मग अशा परिस्थितीत तपासात संस्थेच्या विरोधात काहीच मिळाले नाही. पाच जणांपैकी तीन जणांची निर्दोष मुक्तता सत्र न्यायालयाने यापूर्वीच केली आहे. शिक्षा झालेल्या दोघांपैकी एकाचा म्हणजे शरद कळसकर या हिंदुत्वनिष्ठ युवकाचा जामीन आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाने ‘आरोपी शरद कळसकर घटनास्थळी होता, हेच सिद्ध झालेले नाही’, असे मानून हा जामीन दिलेला आहे, हे अतिशय महत्त्वाचे आहे. गेली १० वर्ष सनातन संस्था सांगत होती की, यात संस्थेचा सहभाग नाही, तरी पुन्हा पुन्हा संस्थेला गुंतवण्याचा प्रयत्न झाला. निदान आता न्यायालयाच्या निर्णयांनंतर तरी हे लोक शांत बसतील का? असा प्रश्न सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी यांनी केला.
श्री. वर्तक पुढे म्हणाले की, या प्रकरणात वेळोवेळी दाभोलकर कुटुंबियांची ‘दाभोलकरांचे खरे खुनी नाही सापडले तरी चालतील, किंबहुदा खरे खुनी सोडा; पण सनातनच्या साधकांना वाट्टेल ते करून अडकवा’, अशीच भूमिका शेवटपर्यंत राहिलेली दिसली. याचा अर्थ त्यांना दाभोलकरांच्या खऱ्या खुन्यांशी देणेघेणे नसून, केवळ हिंदुत्ववाद्यांना चिरडायचे होते. आम्ही हिंदु संघटना म्हणून अन्याय झालेल्या प्रत्येक हिंदूंच्या पाठीशी आहोत आणि यापुढेही राहू. या जामीनासाठी न्यायालयीन लढा देणारे ज्येष्ठ अधिवक्ता नितीन प्रधानजी, अधिवक्त्या सिद्धविद्याजी, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकरजी, अधिवक्ता शुभदा खोतजी आणि सहयोगी सर्व अधिवक्त्यांचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो. आमची न्यायदेवतेवर श्रद्धा आहे की, या दोघांनाही न्याय मिळून लवकरच हेही निर्दोष मुक्त होतील.





