नवी दिल्ली: देशात निर्माण झालेल्या एलपीजी टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्या ग्राहकांकडे पाइप नॅचरल गॅस (PNG) कनेक्शन आहे, त्यांना आता घरगुती एलपीजी (LPG) सिलेंडर घेता येणार नाही, तसेच त्यांना सिलेंडरचे रिफिलही मिळणार नाही.
मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ज्यांच्याकडे PNG आणि LPG अशी दोन्ही कनेक्शन्स आहेत त्यांनी तात्काळ त्यांचे एलपीजी कनेक्शन परत करावे. तसेच अशा ग्राहकांना कोणत्याही सरकारी तेल कंपनीकडून किंवा त्यांच्या वितरकांकडून सिलेंडर रिफिल घेण्यासही मनाई करण्यात आली आहे. एलपीजी (पुरवठा व वितरण नियमन) आदेशात सुधारणा करत हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
मध्य पूर्वेतील इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे. सुधारित नियमांनुसार PNG कनेक्शन असलेल्या ग्राहकांना नवीन घरगुती एलपीजी कनेक्शन घेण्यासही निर्बंध घालण्यात आले आहेत.
अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार; गावच्या चावडीत बांधून ठेवल्याची संतापजनक घटना
दरम्यान, भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फताली यांनी भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्यास परवानगी दिल्याची माहिती दिली आहे. भारत आणि इराण यांच्यातील दीर्घकालीन मैत्री व सामायिक हितसंबंध लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालयाचे मुख्य सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी सांगितले की, ‘शिवालिक’ आणि ‘नंदा’ ही दोन भारतीय एलपीजी वाहक जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे पार झाली असून ती भारताकडे येत आहेत. या जहाजांमधून सुमारे ९२,७०० मेट्रिक टन एलपीजी भारतात आणले जात आहे.
ही दोन्ही जहाजे १६ आणि १७ मार्च रोजी मुंद्रा आणि कांडला बंदरांवर पोहोचण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे एलपीजी पुरवठा सुरळीत करण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





