आज दि.१२ मार्च २०२६ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांनी अकोला येथील २ व आकोट येथील २ अशा ४ पत्रकारांसंदर्भात ते बिश्नोई टोळीशी संबंधित असून त्यांचेकडून माझी सुपारी दिली जाण्याची शक्यता असल्याने त्यांची कसून चौकशी करण्यात यावी आणि त्यांना दंडित करावे अशी मागणी केल्याने अकोला व आकोट शहरात एकच खळबळ उडाली आहे.
काहीच दिवसांपूर्वी अकोला पूर्वचे आमदार साजिद खान पठाण यांना खंडणी मागणी करिता धमकीचा फोन आला होता. त्या संदर्भात पठाण यांनी पोलीस तक्रार केली होती. सोबतच त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन ह्या खंडणीची बातमी जनतेपर्यंत पोहोचवली होती.
तत्पूर्वी एका भाजप पदाधिकाऱ्याला ह्याच खंडणी मागणारा कडून एक फोन आल्याची व त्याला आमदार प्रकाश भारसाकळे यांचे कडून खंडणी मिळवून देण्याची धमकी दिल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. त्यातच ही खंडणी आमदार भारसाखळे यांनाच मागितल्याच्या चर्चेची भर पडली.
या संदर्भात महा व्हाईस कडून काही भाजप पदाधिकाऱ्यांकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु त्यांचेकडून कोणतीच माहिती मिळाली नाही. इतकेच काय आपणास कोणताच फोन आला असल्याचे त्यांनी उत्तर दिले.
या संदर्भात पोलिसांकडे माहिती घेतली असता याबाबतीत कोणतीच तक्रार प्राप्त झाली नसल्याने कळले. विशेष म्हणजे या संदर्भात प्रकाशित बातम्यांवर ना कुणी आक्षेप घेतला ना कुणी त्या बातम्यांचे खंडन केले. त्यातच आमदार भारसाखळे हे कौटुंबिक कारणाने कुठेच वावरताना आढळून आले नाहीत.
त्यामुळे खंडणीची ही धमकी आमदार भारसाखळे यांनाच मिळाल्याचा लोकांचा ग्रह झाला. अशा स्थितीत या नवीन वर्षाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू झाले. तिथेही आमदार भारसाखळे फिरकले नसल्याच्या वार्ता कानी येत होत्या. महत्त्वाचे म्हणजे आमदारांच्या वर्तमान स्थितीबाबत भाजपाचे कोणतेही कार्यकर्ते काहीही बोलण्यास तयार नव्हते.
त्यामुळे आमदार भासाखळे यांचे बाबत एक अनामिक गुढ निर्माण झाले. अशातच आकोट मतदार संघातील मुंडगाव या ठिकाणी आमदार भारसाखळे अवतीर्ण झाले. त्यांनी एका कार्यक्रमात भागही घेतला. त्यामुळे मतदारसंघातील लोकांना हायसे वाटले.
त्याचे दोन-तीन दिवसानंतर आमदार भारसाखळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हजेरी लावली. या हजेरीदरम्यान त्यांनी अतिशय सनसनाटी निर्माण केली. दि.१२ मार्च २०२६ रोजी त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक हक्क भंग पटलावर घेतला.
या हक्क भंगामध्ये त्यांनी अकोला शहरातील वृत्तवाहिन्यांचे २ पत्रकार उमेश अलोने व अक्षय गवळी, वृत्तपत्राचे पत्रकार रवी मोरे व पोर्टल पत्रकार संजय आठवले यांचेवर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की हे पत्रकार ब्लॅकमेलिंग ची कामे करतात. या चौघांनीही बिश्नोई टोळीशी माझा संबंध जोडून त्यांचेकडून मला खंडणी मागण्यात आल्याची वृत्ते प्रकाशित केली.
वास्तविक या चौघांकडे याबाबतीत कोणताच पुरावा नाही. त्यातच रवी मोरे आणि संजय आठवले हे सराईत आहेत. पोलीस रेकॉर्डवर त्यांची नावे आहेत. परंतु पोलीस त्यांना हात लावण्यास धजत नाहीत. हे सारे लोक माझी सुपारी देऊन माझा घात करू शकतात. हेच लोक बिश्नोई गॅंगशी संबंधित आहेत.
त्यामुळे या चौघांचीही कसून चौकशी करण्यात येऊन त्यांना दंडित करण्यात यावे. भारसाखळेंच्या या मागणीवर विधानसभा अध्यक्षांनी योग्य तो अहवाल मागवून रीतसर कारवाई करण्याचे आमदार भारसाखळे यांना सांगितले.
या घटनेने जिल्हाभरात सनसनाटी निर्माण झालेली आहे. सोबतच या प्रकरणात काय काय होऊ शकते? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे याप्रकरणी नेमके काय होते हे पाहणे औत्स्युक्याचे झाले आहे.





