श्रीमद् विद्याधीश तीर्थ स्वामीजी यांची सनातन संस्थेच्या रामनाथी येथील आश्रमाला सदिच्छा भेट!

By: Editor _2

On: Thursday, February 19, 2026 12:16 PM

Google News
Follow Us

घराघरात रामराज्य निर्माण केल्यास देशात रामराज्य येण्यास विलंब होणार नाही ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ स्वामीजी

फोंडा (गोवा) – सनातन संस्था रामराज्य निर्माण करण्यासाठी कृतीशील आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाने स्वतःच्या घरात रामराज्य निर्माण केल्यास देशात रामराज्य निर्माण होण्यास विलंब होणार नाही, असे प्रतिपादन श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचे २४ वे पू. मठाधिपती श्रीमद् विद्याधीश तीर्थ स्वामीजी यांनी केले. पू. स्वामीजी यांनी सनातन संस्थेच्या रामनाथी, फोंडा, गोवा येथील मुख्य आश्रमाला सदिच्छा भेट दिली, या प्रसंगी स्वामीजींनी वरील गौरवोद्गार काढले.
          या मंगलप्रसंगी सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे यांनी त्यांचे भावपूर्ण स्वागत केले. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि सनातनचे साधक श्री. निषाद देशमुख यांनी पू. स्वामीजींना आश्रमदर्शन करतांना सनातनच्या राष्ट्र आणि धर्म प्रसाराच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली.
या वेळी श्री रामनाथ देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. वल्लभ कुंकळ्ळीकर, समितीचे विधी सल्लागार अधिवक्ता राजेश तळावलीकर, समितीचे सदस्य श्री. संजीव बाले आणि श्री. रुद्र कापडी, तसेच श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचे गुरुजी श्री. संतोष आचार्य आणि श्री. वसंत आचार्य हेही उपस्थित होते. सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी स्वामीजींना आश्रमात येण्याविषयी श्री रामनाथ देवस्थान येथे जाऊन त्यांना प्रार्थना केली होती.
         या वेळी पू. स्वामीजींचे गुरु श्रीमद् विद्याधिराज तीर्थ स्वामीजी यांच्या पादुकांचे पूजन सनातनचे साधक दांपत्य डॉ. पांडुरंग मराठे आणि सौ. मंगला मराठे यांनी केले. तसेच श्रीमद् विद्याधीश तीर्थ स्वामीजींची पंचारती केली. यानंतर सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे यांनी स्वामीजींचा भावपूर्ण सन्मान केला.
साधकांना मार्गदर्शन करतांना श्रीमद् विद्याधीश तीर्थ स्वामीजी म्हणाले, ‘‘सनातन संस्था सनातन धर्माचे रक्षण करणे आणि सनातन धर्माचा प्रचार करण्यासाठी कटीबद्ध आहे, हे पाहून खूप आनंद होतो. सनातन संस्था ‘इतरांचे जीवन आनंदी करून त्यामधून स्वत: आनंद घेणे’ या तत्त्वानुसार चालते. सनातन संस्था सर्वांना संघटित करून त्यांच्यामध्ये ईश्वर सेवेद्वारे धर्मजागृती करत आहेत. सनातनचे साधक प्रतिदिन देवाची उपासना करतात आणि सर्वाचे शुभ चिंततात. सत्संगाचे हे महत्त्व आहे.
         सनातनच्या साधकांनी भगवान श्रीकृष्ण आणि श्रीराम यांची उपासना अशीच अधिक भक्तीने करत रहावी. देवाशी आपण जोडलो गेल्याने देव आपल्या कार्यात येणार्‍या अडचणी दूर करत असतो. देवाची उपासना करणार्‍यांकडे दुसर्‍याचा पाहण्याचा दृष्टीकोनही सकारात्मक होत असतो. यामुळे ईश्वर भक्ती करणार्‍यांना कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नसते. साधकांवर भगवंताचा कृपाशीर्वाद सतत राहो. त्यांचे कष्ट दूर होवो, अशी श्रीराम आणि श्री‍ वीरविठ्ठल यांच्या चरणी प्रार्थना करतो.’’
श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाला नुकतीच ५५० वर्षे पूर्ण झाली, या निमित्ताने २८ नोव्हेंबर २०२५ या दिवशी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते मठाच्या परिसरातील श्रीरामाच्या ७७ फूट उंच कांस्य धातूच्या भव्य मूर्तीचे अनावरण करण्यात आले होते.
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026