रक्षाबंधन २०२५ : राखीला तीन गाठी मारण्यामागचं रहस्य जाणून घ्या!

रक्षाबंधनाचा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्य, सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. पण परंपरेनुसार राखी बांधताना तिच्या दोऱ्याला तीन गाठी माराव्यात असे मानले जाते. यामागे धार्मिक तसेच भावनिक दोन्ही तर्क आहेत.

राखी बांधण्याची परंपरा

सकाळी बहिणी पाट मांडून, त्यासभोवती रांगोळी काढतात. पाटावर आसन घालून भाऊ बसवला जातो. त्यानंतर त्याला गंध, अक्षता लावून सोन्याच्या अंगठीने किंवा दोन सुपाऱ्यांनी औक्षण केले जाते. मग राखी बांधून भावाकडून रक्षणाचे वचन घेतले जाते.

तीन गाठींचा धार्मिक अर्थ

काहीजण राखी फक्त दोन गाठींनी बांधतात, पण तीन गाठी बांधण्यामागे एक श्रद्धा आहे. या तीन गाठींना त्रिदेवांचा आशीर्वाद मानले जाते –

  • पहिली गाठ – ब्रह्मा (सृजन)

  • दुसरी गाठ – विष्णू (पालन)

  • तिसरी गाठ – महेश (संहार व रक्षण)

त्रिदेव या जगाचा सांभाळ करतात, तसेच भावाचेही रक्षण करावे, त्याच्यावर कृपादृष्टी ठेवावी, या भावनेने या गाठी बांधल्या जातात.

भावनिक अर्थ

या गाठींना नात्याचं बंधन मानलं जातं –

  1. पहिली गाठ – भावाच्या दीर्घायुष्यासाठी

  2. दुसरी गाठ – बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी

  3. तिसरी गाठ – नात्यातील गोडवा आणि एकोप्यासाठी

रक्षाबंधन २०२५ चा मुहूर्त

  • तारीख: शनिवार, ९ ऑगस्ट २०२५

  • श्रावण पौर्णिमा: ८ ऑगस्ट दुपारी २:१२ पासून ९ ऑगस्ट दुपारी १:२४ पर्यंत

  • पंचक प्रारंभ: ९ ऑगस्ट रात्री २:११ वाजता

  • त्यामुळे रक्षाबंधनाचे विधी पौर्णिमा कालावधीत व पंचक सुरू होण्यापूर्वी करणं शुभ मानलं जात आहे.