धनादेश वटवण्यासाठी आता फक्त काही तास – RBIचा नवा नियम 4 ऑक्टोबरपासून लागू

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील बँकिंग प्रणालीत मोठा बदल जाहीर केला आहे. यानुसार, आता धनादेश वटवण्यासाठी दोन दिवसांची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. काही तासांतच धनादेशाची रक्कम खात्यात जमा होणार आहे. या उपक्रमाचा उद्देश चेक क्लिअरिंग प्रक्रिया वेगवान करणे, जोखीम कमी करणे आणि ग्राहकांना अधिक गतिमान सेवा देणे आहे. RBI यासाठी settlement on realization पद्धतीकडे वाटचाल करत आहे.

📅 कधी लागू होणार नवी व्यवस्था?

नवी जलद धनादेश वटवणीची प्रक्रिया 4 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होईल. या अंतर्गत, ग्राहकांकडून मिळालेला चेक तत्काळ स्कॅन करून क्लिअरिंगसाठी पाठवला जाईल. सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत एका सिंगल क्लिअरिंग सत्रात प्रक्रिया पूर्ण होईल. त्यामुळे ग्राहकांना चेक वटण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही.

🛠 दोन टप्प्यांत अंमलबजावणी

पहिला टप्पा (4 ऑक्टोबर 2025 – 2 जानेवारी 2026)

  • बँकेने धनादेश प्राप्त झाल्याची पुष्टी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत द्यावी लागेल.

  • बँकेने स्वीकारला की नाकारला, हे स्पष्ट करावे लागेल.

  • प्रतिसाद न दिल्यास, चेक स्वीकारल्याचे गृहीत धरले जाईल आणि पुढील प्रक्रिया सुरू होईल.

दुसरा टप्पा (3 जानेवारी 2026 पासून कायमस्वरूपी)

  • धनादेश मिळाल्यानंतर फक्त 3 तासांत बँकेला पुष्टी द्यावी लागेल.

  • पुष्टी मिळताच लगेचच ग्राहकांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल.

या बदलामुळे चेक क्लिअरिंगची गती लक्षणीय वाढणार असून, ग्राहकांना तत्काळ निधी मिळणे सुलभ होणार आहे.