Vaishnavi Hagawane : दुसऱ्याशी चॅटिंग ते बाळाचा ताबा, हगवणेंच्या वकिलाचे आरोप; वैष्णवीचे नातेवाईक म्हणाले, मुलीचं एकतर्फी प्रेम….

Vaishnavi Hagawane : वैष्णवी हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या हगवणे कुटुंबातील पाच जणांच्या पोलीस कोठडीत आज वाढ करण्यात आली. सासू, पती आणि नणंदेला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तर सासरा आणि दीर यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी हगवणेंच्या वकिलांनी अनेक आरोप करत वैष्णवीचं चारित्र्यहनन केलं. ती नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती आणि त्याच कारणातून तिने आत्महत्या केली असावी असा दावा हगवणेंच्या वकिलांनी केलाय.

हगवणेंच्या वकिलांनी केलेल्या दाव्यांवर वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले की, आरोपी हा आरोपी असतो, तो गुन्हेगार आहे. कोणीच आपले गुन्हे कबूल करत नाही. पण आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. पोलीस योग्य तपास करतायत. जे आरोप करत आहेत त्याचा आम्ही निषेध करतो. आमच्या वकिलावर आमचा विश्वास आहे

वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅटिंग करत होती आणि ती व्यक्ती बोलायचं बंद झाल्यानं तिनं आत्महत्या केली असावी. आत्महत्येचं मुख्य कारण वेगळंच असल्याचं हगवणे यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. मात्र वैष्णवीच्या मामांनी हगवणेंच्या वकिलांनी केलेला दावा फेटाळला. मुळात असला कुठलाही चॅटिंगचा प्रकार झाला नाहीय. आम्ही कोणतेही मोबाईल काढून घेतले नाहीयेत. मुलीचं एकतर्फी प्रेम होतं, पण त्यांचं पैशावर प्रेम होतं.

वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाण याला सांभाळण्यासाठी हगवणे कुटुंबानेच सांगितलं होतं. निलेश चव्हाणने बाळाची काळजी घेतली. वैष्णवीच्या आई-वडिलांनी बाळाची विचारपूसही केली नव्हती असं हगवणेंच्या वकिलांनी म्हटलं होतं. यावर वैष्णवीच्या नातेवाईकांनी सांगितलं की, वैष्णवीचा मृत्यू १६ तारखेला झाला आणि आम्ही १७ तारखेला बाळाबद्दल विचारणा केली. करिष्मासोबत बोलणं झालं होतं. तेव्हा राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मेहुणीने बाळ रडतंय, घेऊन जा असं सांगितलं होतं.

वैष्णवीचे काका म्हणाले की, चॅटिंगसंदर्भात केले जाणारे दावे खरे नाहीत. असा कुठलाच प्रकार झाला नाहीय. दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. चॅटींग किंवा जे आरोप केलेले आहेत ते चुकीचे आहेत. आता या केस मध्ये दुसरं काही सापडत नाही त्यामुळे अशी चुकीची माहिती काढली जाते आहे. आमच्या मुलीवर आमचा पूर्णपणे विश्वास होता. जे हक्क सोड झालेला आहे ते आधीच झालेले आहे, त्यावेळेस वैष्णवी आमच्याकडे होती.