Rain News : महाराष्ट्रात यंदा मान्सूनने 12 दिवस आधी म्हणजेच 25 मे रोजीच दमदार एंट्री केली आहे. सर्वसाधारणपणे 7 जूनला मान्सून राज्यात दाखल होतो. केरळमध्येही यंदा वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला होता. मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत असून हवामानातील बदल नागरिकांना जाणवत आहे. मात्र आता भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अपडेटनुसार, लवकरच मान्सूनचा वेग थंडावणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मान्सून पोहोचला असून आज आणि उद्या पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण 30 मेनंतर मान्सूनचा प्रवास संथ होईल आणि संपूर्ण विदर्भ व्यापण्यासाठी 15 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, अशी माहिती नागपूर वेधशाळेचे वरिष्ठ वैज्ञानिक प्रवीण कुमार यांनी दिली आहे.
हवामान खात्याने शेतकऱ्यांना पेरणीसंबंधी घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस होईपर्यंत पेरणी टाळावी, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने यंदा राज्यासह देशभरात सरासरीपेक्षा अधिक, म्हणजेच सुमारे 108% पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः देशाच्या दक्षिण आणि मध्य भागांत अधिक पावसाची शक्यता आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. सकाळी थोडी उसंत मिळाल्यानंतर पुन्हा एकदा कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर या उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. कल्याण-डोंबिवली परिसरातही जोरदार पावसाचा फटका बसला आहे.
मान्सूनने महाराष्ट्रात दमदार सुरुवात केली असली तरी येत्या काही दिवसांत त्याचा वेग कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे. पाऊस सध्यातरी दिलासा देणारा असला तरी हवामान विभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.