Pune Crime : पुण्यातील कोंढवा परिसरात एक धक्कादायक आणि भयावह घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने आपल्या जुन्या मित्राला घरात बोलावून त्याच्याविरुद्ध क्रूर आणि नियोजित कट रचला. चहासाठी आमंत्रण देत तिने मोठ्या आपुलकीने त्याला घरी बोलावलं आणि तो आत येताच, त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. मिरचीच्या तीव्रतेमुळे त्याला काहीच दिसेनासं झालं. हा हल्ला का करण्यात आला, याचा उलगडा पुढील घडामोडींमधून झाला.
तिघे साथीदार आधीच सज्ज
महिलेने हल्ला करताच काही वेळातच तिचा पती आणि त्याचे दोन साथीदार घरात पोहोचले. हे सर्व आधीच नियोजित असल्याचं स्पष्ट झालं. चौघांनी मिळून पीडितावर अमानुष मारहाण केली. इतकंच नव्हे, तर त्याच्या तोंडात जबरदस्तीने काठी घातली आणि हात-पाय दोरीने घट्ट बांधले.
खंडणीसाठी रचलेला कट
हल्ला केल्यानंतर या टोळीने पीडिताकडून खंडणीची मागणी केली. त्यामुळे ही घटना केवळ मारहाणीची नसून सुनियोजित अपहरण आणि आर्थिक वसुलीचा कट होता, हे समोर आलं. घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी त्वरीत कारवाई केली आणि अवघ्या चार तासांत पीडिताची सुटका करून चारही आरोपींना अटक केली.
अटक केलेल्या आरोपींची माहिती
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:
- सोनल उर्फ सोनी रायकर (वय ३५)
- अतुल रायकर (पती, वय ३८)
- रवी मंडल (वय २४)
- सुशांत हान (वय ३१)
सर्व आरोपी कोंढवा परिसरातील रहिवासी आहेत. पीडित व्यक्तीचे वय ३९ वर्षे असून त्याने पोलिसांकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे.
जुनी मैत्री ठरली घातक
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आणि पीडित यांच्यात अनेक वर्षांपासून ओळख होती. त्याच विश्वासावर पीडिताने कोणताही संशय न बाळगता तिच्या घरी जाणे स्वीकारले. मात्र या विश्वासाचं इतकं भीषण रूप घेईल, याची त्याला कल्पनाही नव्हती.