Vaishnavi Hagwane Case : फक्त वैष्णवीच नाही तर हगवणेंच्या घरात आणखी एकीचा छळ; ..तर ही घटनाच घडली नसती!
पुणे – वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या घरात काय चालत होतं, हा प्रश्न आता अधिक गडद होतो आहे. कारण, फक्त वैष्णवीच नाही तर त्यांच्या मोठ्या सुनेचा – मयुरी हगवणे हिचा – देखील तितकाच अमानुष छळ करण्यात आला होता.
करोडोंचा हुंडा असूनही सुनेचा छळ, गरोदरपणातही मारहाण
लग्नात भरघोस हुंडा घेऊनही वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ झाला. गरोदर असताना देखील तिच्यावर हात उचलण्यात आला. पोस्टमॉर्टम अहवालानुसार तिचा मृत्यू गळा दाबून करण्यात आला होता. या सर्व घटनेनंतर आता मयुरी हगवणे हिने देखील अशाच प्रकारच्या छळाची तक्रार आधीच नोंदवली होती, हे स्पष्ट होत आहे.
मयुरी हगवणेची पोलिसांत तक्रार
राजेंद्र हगवणे यांचा मुलगा सुशील हगवणे याची पत्नी मयुरी हगवणे हिने ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पौड पोलिस ठाण्यात आपल्या सासरच्या लोकांविरोधात तक्रार दिली होती. सासू लता, नणंद करिश्मा, दीर शशांक आणि स्वतः सासरे राजेंद्र हगवणे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. तिने छळ, मारहाण, आणि विनयभंगासंबंधीच्या घटना स्पष्ट केल्या होत्या.
शारीरिक व लैंगिक छळाचे गंभीर आरोप
मयुरीच्या तक्रारीनुसार, ५ नोव्हेंबर रोजी लता हगवणे यांनी पैशावरून वाद घालत शिवीगाळ केली व मारहाण केली. त्यानंतर करिश्मा, शशांक आणि राजेंद्र हगवणे यांनीही मयुरीला मारहाण केली. यावेळी राजेंद्र हगवणे यांनी तिचे कपडे फाडत लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप तिने केला आहे. तिचा मोबाईल काढून घेण्यात आला. खोलीतील दागिने व रोख पैसे गायब होते, त्यामुळे सासरच्यांवर चोरीचा संशयही मयुरीने व्यक्त केला होता.
राजकीय दबावामुळे तपासात अडथळा?
या सगळ्या तक्रारी असूनही राजेंद्र हगवणे हे अजित पवार यांच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते असल्याने पोलिसांवर दबाव होता. त्यामुळे पुढील तपास थांबवण्यात आला, असा आरोप आहे. मयुरीनं वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या, पण पोलिस व सासरच्या संगनमतामुळे तिला माघार घ्यावी लागली होती.
वेळेवर कारवाई झाली असती तर…
या साऱ्या प्रकारावरून स्पष्ट होतं की, जर मयुरीने २०२४ मध्ये दिलेल्या तक्रारीनंतर कडक आणि तत्काळ कारवाई झाली असती, तर कदाचित वैष्णवी आज हयात असती. हगवणे कुटुंबीयांकडून सातत्याने सुना आणि महिलांवर अन्याय होत असल्याचे या घटनांमधून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.