Chitra Wagh | आज 21 व्या शतकात देखील हुंड्यामुळे अनेक ठिकाणा महिला आत्महत्या करत आहेत, तर काही ठिकाणी महिलांचे प्राण घेतले जात आहे. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. वैष्णवीच्या आई – वडिलांनी लेकीच्या सासरच्या मंडळींवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. माझ्या मुलीने आत्महत्या केली नाही तर, तिची हत्या करण्यात आली… असे आरोप हगवणे कुटुंबियांवर करण्यात आले आहेत. दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थरकाप उडवणारी घटना सांगितली आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत चित्रा वाघ म्हणाल्या, ‘अंबरनाथ ग्रामीणची एक केस होती. सात महिन्यांची प्रेग्नेंटबाई होती, तिला थांबाला बांधून जिवंत जाळली होती. मी गेले होते तेथे… म्हणजे जीवाचा थरकाप उडवणारा क्षण होता. तिच्या पोटातल्या बाळाला देखील मारुन टाकलं. त्या बाईला मारुन टाकलं. अक्षरशः खांबाला बांधून तिला अख्खी जाळली.’
‘पोळी भारकी शेकताना जरासा बोट भाजला तरी दिवसभर आपण पाण्याखाली बोट धरतो. कोलगेट लावतो, बर्फाने शेकवतो… तेव्हा त्या बाईच्या जीवाचा काय थरकाप झाला असेल आणि कशासाठी हुंड्यासाठी… पैसे, दागिने… हे असे लांडगे खूप आहेत. ही विकृती आहे समाजामध्ये, ही कुठेतरी ठेचून काढली पाहिजे… पुन्हा त्याच्यासाठी मी तेच म्हणेल कायदे आहेत. पण समाज प्रबोधनाची देखील गरज आहे.’
पुढे चित्रा वाघ म्हणाल्या, ‘तिला मारणारे कोण होते फक्त पुरुष होते का, तर नाही… तिची सासू देखील होती. ती पण बाई आहे ना… एक बाई दुसऱ्या बाईचं दुःख समजू शकत नाही. हे आणखीन वाईट आहे…’ असं देखील चित्रा वाघ म्हणाल्या.
वैष्णवी हगवणे प्रकरणावर देखील चित्रा वाघ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. वैष्णवी हगवणेची आत्महत्या नाही तर हत्याच आहे. पैशांसाठी मुलीला एवढा त्रास देणं हे अमानवी आहे. राजेंद्र हगवणे कोणत्याही पक्षाचा असला तरी वैष्णवीला न्याय मिळवून देणारच असंही चित्रा वाघ म्हणाल्या. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त वैष्णवी हगवणे प्रकरणाची चर्चा सुरु आहे.
प्रकरणात 5 जणांना अटक झाली आहे. वैष्णवीचा पती, सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. या सर्वांची पोलीस कोठडी 28 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर देखील वैष्णवी हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.