भगवान परशुराम जयंती २९ एप्रिल निमित्त

दुष्टांचा संहार करणारा ब्राह्म-क्षात्र तेजयुक्त अवतार : भगवान परशुराम

भगवंताने  विविध काळात भक्ताच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी अवतार धारण करून धर्मसंस्थापन व अधर्मनाश केला. या अवतारांमध्ये भगवान परशुराम हे एक अत्यंत प्रभावशाली, तेजस्वी आणि अद्वितीय  योद्धावतार आहेत. श्रीविष्णूचा सहावा अवतार असलेल्या परशुरामाने ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा उत्तम संगम करून अधर्माचा संहार केला.

सप्तचिरंजीवांपैकी एक व काळावर विजय मिळवणारा अवतार :भगवान परशुराम हे सप्त चिरंजीवांपैकी एक आहेत. त्यांनी काळावर विजय मिळवला आहे, म्हणून ते आजही अदृश्य रूपात पृथ्वीतलावर विद्यमान आहेत. त्यांचे स्मरण प्रातःकाळी केल्याने पुण्यप्राप्ती होते. हे आजच्या तणावपूर्ण जीवनात भक्तांसाठी प्रेरणादायक आहे. मनःशांती, संयम व पराक्रमासाठी त्यांचे स्मरण करतात.

ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा संगम :परशुराम जन्माने ब्राह्मण होते, पण त्यांनी क्षात्रतेज अंगीकारले. ते पित्याच्या ब्राह्मतेजामुळे ज्ञानी व तपस्वी होते, तर मातेकडून आलेल्या क्षात्रगुणांमुळे पराक्रमी व निर्भय योद्धा होते. आजच्या काळात जबाबदाऱ्या स्वीकारताना “गुणावर आधारित कर्म” हे तत्त्व त्यांनी कृतीने शिकवले.

अपराजेय योद्धा व शिस्तप्रिय शिष्य : परशुराम हे केवळ योद्धा नव्हते, तर अत्यंत शिस्तबद्ध व तपस्वी शिष्य होते. त्यांनी कश्यप मुनी आणि शिव यांच्याकडून ज्ञान प्राप्त केले. त्यांनी तपश्चर्येच्या बळावर दैविक अस्त्रविद्या मिळवली. आजच्या तरुणांनी, त्यांच्या शौर्याइतकेच, त्यांच्या साधनेचे व ज्ञानार्जनाचे अनुकरण करण्याची गरज आहे.

शास्त्र आणि शस्त्र यांचा आदर्श समन्वय : “अग्रतः चतुरो वेदाः, पृष्ठतः सशरं धनुः” या श्लोकाने परशुरामांच्या व्यक्तिमत्त्वाचे सार सांगितले आहे. त्यांच्या जीवनात ज्ञान आणि पराक्रम यांचा आदर्श संगम होता. त्यांनी शाप देऊन आणि शस्त्राने शत्रूंचा नाश केला. आजच्या युगात “शिक्षण + शौर्य” हे मूल्य गमावले जात असताना, परशुराम यांचे उदाहरण अत्यंत उपयुक्त आहे.

अधर्माच्या विरोधात प्रखर संघर्ष : कार्तवीर्य सहस्रार्जुनासारख्या अधर्मी राजाचा नाश करण्यासाठी त्यांनी आधी तपश्चर्या करून सूक्ष्म स्तरावर त्याचा पुण्यकेंद्र दुर्बल केले, मग प्रत्यक्ष युद्धात त्याला पराभूत केले. हे अधर्माच्या विरोधातील संघर्षाचे अद्वितीय उदाहरण आहे. समाजात अनीती वाढत असताना परशुरामांचा हा बाणा आदर्श ठरतो.

गोमातेचे रक्षण आणि क्षत्रिय संहार : कार्तवीर्याने कामधेनूचे अपहरण केल्यावर, परशुरामाने ती परत आणण्यासाठी उन्मत्त क्षत्रिय संहाराचा संकल्प केला. २१ वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करून त्यांनी अधर्मी क्षत्रियांना संपवले. यातून ‘धर्मासाठी उठलेली शस्त्रे कधीही पवित्र असतात’ हे शिकवण मिळते.

वैराग्य आणि दानशूरता : भगवान परशुराम अत्यंत दानशूर होते. अश्वमेध यज्ञात त्यांनी संपूर्ण भूमी महर्षी कश्यप यांना दान दिली आणि स्वतः महेंद्र पर्वतावर निवास करून संन्यस्त जीवन स्वीकारले. आजच्या काळात सत्ता, संपत्ती आणि अहंकार वाढत असताना त्यांच्या वैराग्याचा आदर्श अत्यंत प्रेरणादायक आहे.

नवसृष्टीचे सर्जनशील कार्य : परशुरामभूमीची निर्मिती ही केवळ भौगोलिक नव्हे तर आध्यात्मिक नवसृष्टी होती. त्यांनी चितेतून चित्तपावन ब्राह्मणांची निर्मिती करून धर्मकार्याला नवा आयाम दिला. सृजनशीलतेसाठी आंतरिक तेजाचे महत्त्व ते शिकवतात.

गुरुशिष्य परंपरेचे पालन : भगवान परशुराम हे शिव आणि दत्तात्रेय या दोन अद्वितीय गुरूंचे शिष्य होते. त्यांनी त्यांच्याकडून वेद, आत्मज्ञान, अस्त्रविद्या आणि योगविद्या मिळवली. आजची शिक्षणपद्धती जेव्हा केवळ अंकगणित व तंत्रज्ञानात मर्यादित होते, तेव्हा त्यांच्या गुरुसेवेतील समर्पण आपल्या मनात जागृती निर्माण करते.

आधुनिक काळातील संदर्भ व महत्त्व : आजच्या काळात समाजात अनीती, भ्रष्टाचार, अन्याय आणि नैतिक अधःपतन वाढले आहे. अशा वेळी भगवान परशुराम यांची शिकवण धर्मासाठी कठोर निर्णय, ज्ञान आणि शौर्याचा समन्वय, गुरुशिष्य भाव, वैराग्य आणि राष्ट्रनिष्ठ यांचे महत्त्व अधिक वाढते.

युवा पिढीने परशुरामांचे गुण आत्मसात केल्यास ती सामर्थ्यवान, विवेकी आणि नि:स्वार्थी होईल. महिलांचा सन्मान, धर्मसंरक्षण, ज्ञानार्जन, संयम आणि आचारधर्म यांचा संगम साधून राष्ट्रविकासात भर घालता येईल.

भगवान परशुराम हे एक महान योद्धा, पराक्रमी तपस्वी, आणि द्रष्टे होते. अशा या  ब्राह्मतेजाने आणि क्षात्रतेजाने युक्त अवतारास शिरसाष्टांग नमस्कार करीत, त्यांच्या आदर्शांनी प्रेरणा घेऊन, आपणही जीवनात धर्म व कर्तव्य निष्ठेने जगावे, हाच त्यांच्या चरणी खरा नमस्कार ठरेल.

संकलक :प्रा. विठ्ठल जाधव ,सौजन्य : सनातन संस्था