स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही आनंदाने कवटाळणारे थोर क्रांतीकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव
भारतमातेसाठी बलीदान करणारर्या क्रांतीकारकांमध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांची नावे एकत्रितपणे घेतली जातात. इंग्रज अधिकारी सँडर्स याच्या जाचातून मुक्तता करणार्या या तिघांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. हे तिन्ही वीर देशभक्तीपर गीत गात गात आनंदाने फाशीला सामोरे गेले. 23 मार्च या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा बलीदानदिन आहे, या निमित्ताने हा लेखप्रपंच …
तत्कालीन परिस्थिती आणि क्रांतीकारकांनी त्यावर काढलेला तोडगा
ख्रिस्ताब्द 1928 मध्ये भारतीय घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडहून `सायमन कमीशन’ नावाचे शिष्टमंडळ भारतात आले. भारतात सर्वत्र या शिष्टमंडळाचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. त्या वेळी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. `सायमन परत जा’ च्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. जमाव पांगवण्यासाठी आरक्षकांनी केलेल्या अमानुष लाठीआक्रमणात लाला लजपतराय घायाळ झाले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. देशभक्तीने भारावलेल्या क्रांतीकारकांना हे सहन झाले नाही. क्रांतीकारकांनी लालाजींच्या मृत्यूला कारणीभूत असणार्या लाहोर आरक्षक ठाण्यातील इंग्रज अधिकारी सँडर्स याला ठार मारण्याचे ठरवले. त्याप्रमाणे लालाजींच्या पहिल्या मासिक श्राद्धाच्या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तिघेही वेष पालटून आरक्षक अधिकारी यांच्या निवासस्थानापाशी गेले. सँडर्स दिसताच सुखदेव याने संकेत केला. भगतसिंग आणि राजगुरू यांनी एकाच वेळी गोळया झाडून त्याचा बळी घेतला आणि तेथून पलायन केले. इंग्रज सरकारने तिघांना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. तसेच त्यांना पकडून देणार्याला पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणाही केली; परंतु बरेच दिवस आरक्षकांना हुलकावणी देत ते तिन्ही क्रांतीकारक भूमिगत राहिले. पुढे फितुरीमुळे ते पकडले गेले. शेवटी 23.3.1931 या दिवशी भारतमातेच्या या तिन्ही सुपुत्रांना फाशी देण्यात आली.
भगतसिंग यांचा अल्प परिचय
जन्म : भगतसिंग याचा जन्म 27.9.1907 या दिवशी पंजाब राज्यातील एका सरदार घराण्यात झाला.
बालपण : भगतसिंग 6-7 वर्षांचा असतानाची गोष्ट. तो शेतावर गेला असता शेतकरी गहू पेरत असलेला पाहून त्याचे कुतुहल जागृत झाले. त्याने विचारले “शेतकरीदादा, तुम्ही या शेतात गहू का टाकत आहात ?” शेतकरी म्हणाला, “बाळ, गहू पेरले की, त्याची झाडे होतील आणि प्रत्येक झाडाला गव्हाची कणसेच कणसे येतील.” त्यावर तो म्हणाला, “मग जर बंदुकीच्या गोळया या शेतात पेरल्या, तर त्याचीही झाडे उगवतील का ? त्यालाही बंदुका येतील का ?” `या गोळया कशाला हव्यात’, असे शेतकर्याने विचारल्यावर `हिंदुस्थानचे राज्य बळकावणार्या इंग्रजांना मारण्यासाठी’, असे क्षणाचा विलंब न करता त्याने आवेशपूर्ण उत्तर दिले.
युवावस्था : पुरेसे महाविद्यालयीन शिक्षण, घरातील सर्व परिस्थिती अनुकूल असतांनाही त्यांनी देशसेवेसाठी आजन्म अविवाहित रहाण्याची प्रतिज्ञा केली आणि ती निभावूनही नेली. ते `नौजवान भारत सभा’, `कीर्ती किसान पार्टी’ आणि `हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनांशी संबंधित होते.
प्रखर देशप्रेम दर्शाविणारे प्रसंग
प्रसंग 1 : फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर भगतसिंग आपल्या आईला म्हणाले, “आई, काळजी कशाला करतेस ? मी फाशी गेलो, तरी इंग्रज सत्ता येथून उखडून टाकण्यासाठी एका वर्षाच्या आत पुन्हा जन्म घेईन !”
प्रसंग 2 : फाशी जाण्याआधी एका सहकार्याने भगतसिंग यांना विचारले, “सरदारजी, फांसी जा रहे हो । कोई अफसोस तो नही ?” यावर गडगडाटी हसून भगतसिंग म्हणाले, “अरे, या वाटेवर पहिले पाऊल टाकतांना `इन्किलाब झिंदाबाद’ ही घोषणा सर्वत्र पोहोचावी, एवढा एकच विचार केला होता. ही घोषणा माझ्या कोट्यवधी देशबांधवांच्या कंठातून निघाली की, तो घोष या साम्राज्यावर घाव घालीत राहील. या छोट्या आयुष्याचे याहून मोठे काय मोल असेल ?”
शिवराम हरी राजगुरू
जन्म : 24.8.1908 या दिवशी महाराष्ट्र राज्यातील पुण्याजवळील खेड येथे एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबात शिवराम राजगुरू याचा जन्म झाला. अचूक नेमबाजी, दांडगी स्मरणशक्ती याची त्यांना जन्मजात देणगी होती. कितीतरी ग्रंथ त्यांना मुखोद्गत होते. हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लीकन आर्मीचे ते सदस्य होते.
राजगुरू याची सहनशीलता दाखवणारे प्रसंग
प्रसंग 1 : एकदा राजगुरू भट्टीतल्या निखार्यांवर आपल्या क्रांतीकारी मित्रांसाठी पोळया भाजण्याचे काम करत होते. तेव्हा एका सहक्रांतीकारकाने निखार्यांची धग लागत असतांनाही शांतपणे पोळया भाजत असल्यामुळे त्यांची प्रशंसा केली. तेव्हा दुसर्या मित्राने त्याला जाणूनबुजून डिवचले आणि `त्याने कारागृहात गेल्यावर तेथे होणारा भयंकर छळ सहन केला, तरच मला कौतुक वाटेल’, असे म्हटले. आपल्या सहनशीलतेविषयी घेतलेल्या शंका न आवडून राजगुरूंने पोळया उलथण्याची लोखंडी सळई उन करून आपल्या उघड्या छातीला लावली. छातीवर टरटरून फोड आला. पुन्हा एकदा त्यांनी तसेच केले आणि हसत-हसत त्या मित्राला म्हणाले,“आता तरी मी कारागृहातील छळ सहन करू शकेन याची निश्चिती पटली ना ?” राजगुरूच्या सहनशीलतेविषयी शंका घेतल्याने त्या मित्राला स्वत:चीच लाज वाटली. `राजगुरू, तुझी खरी ओळख मला आता झाली’, असे सांगत त्याने राजगुरूची क्षमाही मागितली.
प्रसंग 2 : कारागृहात अनन्वित छळ होऊनही राजगुरूंनी सहकार्यांची नावे न सांगणे : `एका फितुरामुळे राजगुरु पकडले गेले. लाहोरमध्ये त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. लाहोरच्या तीव्र उन्हाळयात चहूबाजूंनी भट्टया लावून त्यामध्ये राजगुरूंना बसवण्यात आले. मारहाण झाली. बर्फाच्या लादीवर झोपवण्यात आले. इंद्रीय पिरगळण्यात आले. कशानेही ते बधत नाहीत, हे पाहिल्यावर त्यांच्या डोक्यावरून विष्ठेच्या टोपल्या ओतण्यात आल्या. कणखर मनाच्या राजगुरूंनी हा सर्व छळ सोसला; पण सहकार्यांची नावे सांगितली नाहीत.
प्रसंग 3 : स्वत:च्या दु:खातही इतरांचा विचार करणारे राजगुरू : फाशी जाण्याआधी कारागृहातील एका सहकार्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना राजगुरु म्हणाले, “बाबांनो, फासावर चढताच आमचा प्रवास एका क्षणात संपेल; पण तुम्ही सगळे वेगवेगळया शिक्षांच्या प्रवासाला निघालेले. तुमचा प्रवास अनेक वर्षे खडतरपणे चालू राहील, याचे दु:ख वाटते.”
सुखदेव थापर
जन्म : सुखदेव यांचा जन्म पंजाब राज्यामध्ये, 15.5.1907 या दिवशी झाला. भगतसिंग आणि राजगुरू यांचे सहकारी हीच सुखदेव यांची प्रमुख ओळख.
सुखदेव यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान
सुखदेव हेही हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लीकन आर्मीचे कार्यकारी सदस्य होते. त्यांच्यावर क्रांतीकारक चंद्रशेखर आजाद यांच्या विचारांचा पगडा होता. लाहोर येथे नॅशनल कॉलेजमध्ये असतांना त्यांनी भारताचा वैभवशाली इतिहास आणि जगातील क्रांतीविषयक, तसेच रशियाच्या क्रांतीविषयक साहित्याचा अभ्यास करण्यासाठी एक मंडळ स्थापन केले. भगतसिंग, कॉम्रेड रामचंद्र आणि भगवतीचरण व्होरा यांच्या सहयोगाने त्यांनी लाहोर येथे नौजवान भारत सभेची स्थापना केली. युवकांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी उद्युक्त करणे, शास्त्रीय दृष्टीकोन अंगिकारणे, साम्यवादाविरुद्ध लढा देणे आणि अस्पृश्यता निवारण ही या सभेची उद्दिष्टे होती. ख्रिस्ताब्द 1929 मध्ये कारागृहात असतांना कारागृहातील सहकार्यांच्या होत असलेल्या अनन्वित छळाच्या विरोधात चालू केलेल्या भूक हरतालातही त्यांचा सहभाग होता.
स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही आनंदाने कवटाळणारे थोर क्रांतीकारक
23 मार्च 1931 या दिवशी लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आले. हसत हसत ते मृत्यूला सामोरे गेले. या थोर देशभक्तांना त्रिवार अभिवादन !
संकलक : श्री. पराग गोखले,
सौजन्य : हिंदु जनजागृती समिती