औरंगजेबाच्या कबरीसाठी लाखो रुपये, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला फक्त २५० रुपये?
औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्त्व खात्याकडून दरवर्षी लाखो रुपयांची मदत केली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, २०२१-२२ मध्ये तब्बल ₹२,५५,१६० तर २०२२-२३ (नोव्हेंबरपर्यंत) ₹२,००,६२६ खर्च करण्यात आला. अशाप्रकारे आतापर्यंत ६.५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी केवळ ₹२५० इतकाच तुटपुंजा निधी राज्य सरकारकडून दिला जातो.
ही गोष्ट अत्यंत संतापजनक असून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म व महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांच्या मंदिराला शासनाकडून योग्य निधी दिला जात नाही. उलट, औरंगजेबासारख्या क्रूर आक्रमकाच्या कबरीच्या देखभालीसाठी मोठा निधी दिला जात आहे. ज्याने छत्रपती संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार केले, अशा औरंगजेबासाठी हा खर्च करणे योग्य आहे का?
हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी ही मदत तातडीने थांबवावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी भरघोस आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. सरकारने त्वरित यात लक्ष घालून महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार करावा असेही समितीने म्हटले आहे.