कोणावरही अन्याय्य कारवाई होऊ देणार नाही; तसेच  विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवणार ! – मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात लढा देणार्‍या शिवप्रेमींवरील गुन्हे मागे घेण्याची हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

       पंढरपूर (सोलापूर) – विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन करणार्‍या शिवप्रेमींवर प्रशासनाकडून अन्याय्य कारवाई करत खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन केली. या वेळी शिवसेनेचे मुख्य प्रतोद आणि आमदार श्री. भरतशेठ गोगावले उपस्थित होते. यावर मुख्यमंत्र्यांनी ‘कोणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही, तसेच विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवण्यात येतील. केवळ विशाळगडच नव्हे, तर राज्यभरातील ज्या ज्या गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे झाली आहेत, सर्व हटवण्यात येतील, तसेच सर्व गड-दुर्गांचे शासनाकडून संवर्धन अन् विकास करून त्यांचे पावित्र्य राखले जाईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

      छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावर शेकडो अतिक्रमणे झाली आहेत. ती काढण्यासाठी प्रशासनाने समयसमर्यादेत कारवाई केली नाही. त्यामुळे शिवप्रेमींचा उद्रेक झाला; मात्र आंदोलन करणार्‍या गड-दुर्ग प्रेमींवर दरोड्यासारखी कलमे लावणे, तसेच अनेक निरपराध हिंदूंना अटक करणे, अत्यंत चुकीचे असून या प्रकरणी सर्व हिंदूंवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. तसेच सध्या अतिक्रमण हटवण्याची चालू झालेली मोहिम विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवूनच पूर्ण करावी, तसेच राज्यातील ज्या ज्या गडांवर अतिक्रमणे झाली आहेत, ती सर्व अतिक्रमणे शासनाने तात्काळ हटवावीत, अशा मागण्याही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या.