गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

By: Editor _2

On: Wednesday, September 16, 2026 3:07 AM

Google News
Follow Us

गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?

     गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण देशभरात भक्तिमय वातावरण झालेले पाहायला मिळते. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि बाप्पाच्या आगमनाचा असीम उत्साह अशा निरामय वातावरणात सर्व परिसर न्हाऊन निघतो. परंतु दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत या धार्मिक व्रताला आवाढव्य मूर्तींच्या चढाओढीचे आणि हौशी स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काही गणेश मंडळांच्या ‘आमची मूर्ती सर्वांत उंच’ या एकाच ध्येयासाठी सुरू झालेल्या या शर्यतीत आज भक्तांचा जीव पणाला लागत असून बाप्पाच्या आगमनाचा आनंद शोकांतिकेत परावर्तित होत आहे. हे अत्यंत धक्कादायक तर आहेच; पण आपल्याला अंतर्मुख करणारेही आहे.

उंच मूर्तींमुळे घडलेल्या दुर्घटनांची मालिका

     अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांवर नजर टाकली, तर धक्कादायक चित्र समोर येत आहे. दक्षिण मुंबईतील ‘भुलेश्वरचा राजा’ या मंडळाच्या २२ फूट उंच मूर्तीची आगमनाची मिरवणूक सुरू असताना तोल जाऊन ती थेट गर्दीवर कोसळली. या भीषण दुर्घटनेत संकेत निवशे व ब्रिजेश जोशी या दोन निष्पाप कार्यकर्त्यांना जीव गमवावा लागला, तर चिमुकल्यांसह पाच जण गंभीर जखमी झाले. जळगावच्या ‘जय महाराष्ट्र मित्र मंडळाने’ मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून ४७ हजार रुपये खर्च करून आणलेली १२ फूट उंच मूर्ती वाहतुकीदरम्यान वाटेतच दुभंगली. परिणामी, स्थापनेच्या आधीच बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्याची नामुष्की मंडळावर ओढावली.

     अशाच प्रकारे मुंबईच्या धारावीतील ‘ओम शक्ती फाउंडेशन’च्या प्रेमनगरच्या महाराजाची १५ फूट उंच मूर्ती मिरवणुकीदरम्यान ट्रॉली उलटल्याने शीतल तलावाजवळ रस्त्यावर कोसळली. तिथे सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरी मूर्ती भंगावल्याने स्थापनेपूर्वीच अपघाती विसर्जन करावे लागले. भाईंदर येथील ‘शीतल छाया मित्र मंडळा’च्या आगमनाच्या उत्साहातही मूर्तीचा तोल सुटून ती खाली कोसळली, ज्यामध्ये मूर्ती दुभंगण्यासोबतच अनेक कार्यकर्ते दुखापतग्रस्त झाले.

     ज्या बाप्पाच्या आगमनाने घराघरांत आणि गल्लीबोळात आनंदाचे तरंग निर्माण व्हायला हवेत, तिथे कोणाचा जीव जाणे, गंभीर दुखापत होणे किंवा मूर्ती रस्त्यावर दुभंगावी, यापेक्षा दुःखद घटना अन्य कोणती असू शकेल? हा उत्सव आनंदाचा असायला हवा, पण तो भीती आणि चिंतेच्या सावटाखाली जात आहे. आता तर एका सेल्फीस्टिकमध्ये भ्रमणभाषच्या मधोमध बसवलेली श्री गणेशाची मूर्ती आणलेली दिसली आहे. त्याखाली कार्यकर्ते बसलेले दिसले. ज्या उद्देशाने हा उत्सव सुरू झाला ते बाजूला राहिले अन्‌ अन्य धोकादायक प्रकार सुरू झाले आहेत.

अहंकाराचे प्रदर्शन कि भक्तीचा विसर?

     ज्या भगवान गणेशाला आपण साक्षात अनुभवतो, तो साक्षात अवतरला आहे या भक्तिभावाने त्याच्याकडे पाहतो, तो केवळ एक मूर्ती आहे ही भावना वाढीस लागल्यावर काय दुष्परिणाम होतात याचे हे जिवंत उदाहरण आहे. या भीषण घटनांमागे केवळ अपघात हे कारण नसून काही मंडळांची प्रसिद्धिलोलुप भूमिका, काही मंडळामंडळांमधील जीवघेणी चढाओढ आणि सुरक्षेकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत आहे.

     ५ ते १० टनांची आवाढव्य मूर्ती घडवणे आणि तिची वाहतूक करणे हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकेदायक ठरत आहे. रस्त्यांवरील खड्डे, गतीरोधक, विजेच्या लटकणाऱ्या तारा, मोठे पूल, अरुंद रस्ते आणि वाहतुकीची कोंडी या वस्तुस्थितीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून अशा प्रचंड मूर्ती मिरवणुकीत आणल्या जातात. विसर्जनाच्या वेळी समुद्रात किंवा तलावात या विशालकाय मूर्तींचे शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन होणे अशक्यप्राय असते. क्रेनने मूर्ती पाण्यात लोटताना किंवा ती कोसळताना पाहणे, हे कोणत्याही खऱ्या गणेशभक्ताच्या हृदयाला अतिशय वेदना देणारे चित्र असते. अशा घटनांमुळे पर्यावरणाची हानी होणे, धार्मिक भावना दुखावणे, निष्पाप कार्यकर्त्यांचे जीव जाणे, दुखापत होणे आणि लाखो रुपयांचा चुराडा होणे इतकेच नाही, तर भगवान श्रीगणेशाचा घोर अवमान होतो, हे कार्यकर्ते व प्रशासन यांच्या लक्षात येत नाही हे दुर्दैव आहे.

शास्त्राचा आधार आणि प्रशासकीय अनास्था

     उत्सावात काय असावे आणि काय नसावे ? याबाबत सनातन संस्था आणि अनेक संत, अभ्यासक गेले अनेक वर्षे या संदर्भात सातत्याने प्रबोधन करत आहेत. खरे तर घरगुती गणेशमूर्ती ही १ ते दीड फुटांची किंवा सार्वजनिक गणेश मंडळांची मूर्ती जास्तीत जास्त ३ ते ४ फूट उंचीची असावी. लहान मूर्तीमुळे अपघाताचा धोका रहात नाही. आगमन आणि विसर्जन अत्यंत विनासायास, शिस्तबद्ध आणि भक्तिभावाने पार पडते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे श्रींच्या मूर्तीचे पूर्ण आणि सन्मानपूर्वक विसर्जन होते. दुर्दैवाने शासन आणि प्रशासनाकडून यासंदर्भात कठोर नियमावली आणि मूर्तींच्या उंचीची मर्यादा लादण्यामध्ये मोठी उदासीनता दिसून येते. प्रशासनाने वेळेवर योग्य नियम घातले असते आणि आवश्यक ती जागृती केली असती, तर आज कार्यकर्त्यांना प्राण गमवावे लागले नसते.

अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ

     मोठी आणि उंच मूर्ती आणल्यानेच गणपती नवसाला पावतो किंवा कृपा करतो, असा कुठल्याही धर्मशास्त्रात उल्लेख नाही. ईश्वर हा केवळ भावभक्तीचा भुकेला आहे. त्याला शुद्ध मनाने केलेला नामजप आणि श्रद्धेने अर्पण केलेले एक फूल देखील पुरेसे आहे. जर आपल्या अनावश्यक दिखाव्यामुळे कोणाचे प्राण जाणार असतील, देवाची मूर्ती रस्त्यावर भंगावणार असेल, तर त्याला गणेशोत्सव कसे म्हणावे? केवळ प्रशासनाने नियम घालावेत, एवढ्यावर हा प्रश्न थांबत नाही. गणेश मंडळांनीही स्वतःहून सुरक्षिततेला आणि भक्तीला प्राधान्य देऊन अनावश्यक उंचीच्या स्पर्धेतून बाहेर पडणे आवश्यक आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि प्रत्येक गणेशभक्ताने आता अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे. बाप्पाला स्वतःच्या आवाढव्य मूर्तींची नाही, तर आपल्या सात्त्विक भक्तीची गरज आहे. ही दिखावा संस्कृती थांबवून लहान, सुंदर आणि शास्त्रोक्त गणेशमूर्तींची स्थापना करूया; जेणेकरून हा उत्सव केवळ आणि केवळ अखंड आनंदाचा राहील, दुःखाचा नाही!

संकलक -श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now