प्रतिनिधी – मानस, मुंबई : घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्याचे आश्वासन देणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “महागाई नियंत्रणाचा अर्थ टप्प्याटप्प्याने दरवाढीचे धक्के देणे असा होत नाही,” असे पवार यांनी म्हटले.
घरगुती वापराच्या १४.२ किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत २९ रुपयांची वाढ झाल्याने सिलिंडरचा दर ९१२ रुपयांवरून ९४१ रुपयांवर पोहोचला आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता यांसह देशभरात ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. यापूर्वी पेट्रोल, डिझेल आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढला असताना या नव्या वाढीमुळे घरगुती बजेटवर आणखी परिणाम होणार आहे.
दरवाढीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “सातत्याने होत असलेल्या या दरवाढीचा परिणाम थेट सामान्य नागरिकांच्या संसारावर होत आहे. पंतप्रधानांनी सुरुवातीला महागाई नियंत्रणात ठेवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र नियंत्रणाचा अर्थ टप्प्याटप्प्याने जनतेला धक्के देणे असा नसतो. या धोरणांची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी चुकवावी लागेल.”
दरम्यान, एलपीजी उत्पादन करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, या दरवाढीमुळे त्यांना होणाऱ्या आर्थिक नुकसानीची केवळ अंशतः भरपाई होणार आहे. उद्योग क्षेत्रातील सूत्रांच्या माहितीनुसार, घरगुती सिलिंडरवर अद्यापही कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
याआधी १ जून रोजी व्यावसायिक वापराच्या १९ किलो एलपीजी सिलिंडरच्या दरात ४२ रुपयांची वाढ करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांत व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असून त्याचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यवसायावर झाला आहे. परिणामी अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांच्या दरातही वाढ झाली आहे.
पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीच्या वाढत्या किंमतींमुळे महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत असून आगामी काळातही दरवाढीचा दबाव कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





