नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना एक मोठा खुलासा केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन व्यक्तींनी त्यांची भेट घेऊन 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती. मात्र, निवडणूक आयोगाबद्दल शंका नसल्याने त्यांनी या ऑफरकडे दुर्लक्ष केल्याचे पवार यांनी सांगितले.
पवार म्हणाले, “विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दिल्लीमध्ये मला दोन लोक भेटायला आले. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील 288 जागांपैकी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी आम्ही देतो. मला आश्चर्य वाटलं. निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला कोणतीही शंका नव्हती, त्यामुळे त्यांच्याकडे मी दुर्लक्ष केलं.”
पुढे पवारांनी सांगितले की, त्या दोघांची राहुल गांधींसोबत देखील भेट घालून दिली होती. “आम्ही दोघांनी ठरवलं की अशा प्रकारच्या कामात लक्ष देऊ नये. लोकांमध्ये जाऊन, जो कौल मिळेल तो स्वीकारू,” असे पवार म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांचा दुजोरा
पवार यांच्या या वक्तव्याला पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले, “दोन व्यक्ती पवार साहेबांकडे आल्या होत्या. मतदार यादीत फेरफार करून 160 जागांवर निकाल आपल्या बाजूने वळवण्याची ऑफर त्यांनी दिली होती. मात्र, पवार साहेबांनी अशक्य असल्याचे सांगून त्यांना नकार दिला.”
प्रविण दरेकर यांची टीका
भाजप नेते प्रविण दरेकर यांनी मात्र या दाव्यांना बालिश आणि हास्यास्पद म्हटले. “शरद पवार यांच्या सारख्या अनुभवी नेत्यानं असे बाळबोध दावे करणं आश्चर्यकारक आहे. जर तुमच्याकडे अशी माणसं आली होती, तर तुम्ही त्यांना घेऊन राहुल गांधींकडे का गेला? म्हणजे अशा गोष्टींना समर्थन द्यायचा विचार होता का? आता बैल गेला आणि झोपा केला, असं झालंय,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच, “हतबलतेतून अशा गोष्टी पुढे येत आहेत,” अशीही टिप्पणी दरेकरांनी केली.









