महाराष्ट्राला हादरा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन : ३ जणांचा मृत्यू; बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान घडली घटना

आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या आज बारामती येथे सभा होणार होत्या त्या सभांसाठी आज सकाळी अजित पवार हे मुंबईहून विमानाने बारामती येथे येत होते.

हे विमान बारामती विमान तळावर उतरत असताना अपघात होऊन जवळच्या शेतात कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. डीजीसीएने या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

नुकत्याच झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या पक्षाची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगली व्हावी यासाठी अजित पवार यांनी जोर लावला होता. तसेच पुणे जिल्ह्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होेत.

त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या आज बारामतीमध्ये सभा होणार होत्या. त्या सभांसाठी अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते. दरम्यान, त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं.

अजित पवार यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवला होता. काका शदर पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आलेल्या अजित पवार यांनी सहकार क्षेत्रातून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली. पुढे १९९१ मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.

मात्र ते खऱ्या अर्थाने रुळले ते महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार हे सलग आमदार म्हणून निवडून आले. तसेच अर्थ, नियोजन, जलसंपदा, ऊर्जा अशा प्रमुख मंत्रालयांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद सर्वाधिक काळ सांभाळण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर होता. तसेच सध्या राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते.