BIG NEWS : लागा कामाला; महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला : मुंबईसह २९ मनपांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला मतमोजणी

महाराष्ट्र महापालिका निवडणुका : मुंबई–ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मतदान 15, निकाल 16 जानेवारीला

राज्यातील मुंबई, ठाण्यासह प्रलंबित असलेल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत ही घोषणा केली असून, 15 जानेवारी 2026 रोजी मतदान तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकांसाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यामुळे गेल्या पाच ते सात वर्षांपासून या महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या, आणि आता महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

महापालिका निवडणुकीचे वेळापत्रक

  • नामनिर्देशन पत्र दाखल : 23 ते 30 डिसेंबर

  • अर्जांची छाननी : 31 डिसेंबर

  • उमेदवारी माघार : 2 जानेवारी

  • चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी : 3 जानेवारी

  • मतदान : 15 जानेवारी

  • निकाल : 16 जानेवारी

राज्यातील 27 महापालिकांची मुदत संपली असून, जालना व इचलकरंजी या दोन नव्या महापालिकांचाही यात समावेश आहे. या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्याने त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

एकूण आकडेवारी

  • एकूण मतदार : 3 कोटी 48 लाख

  • एकूण मतदान केंद्रे : 39,147

  • मुंबईतील मतदान केंद्रे : 10,111

  • कंट्रोल युनिट्स : 11,349

  • बॅलेट युनिट्स : 22,000

मुंबई महापालिकेत एक सदस्यीय वॉर्ड पद्धत असल्याने मतदारांना एकच मत द्यावे लागणार आहे. उर्वरित 28 महापालिकांमध्ये एक ते पाच सदस्यीय वॉर्ड असल्याने त्या प्रमाणे मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार असून, ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही, त्यांनी निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या आत ते सादर करणे बंधनकारक असेल.

ज्या 29 महापालिकांमध्ये निवडणूक होणार

  1. बृहन्मुंबई – 227

  2. भिवंडी-निजामपूर – 90

  3. नागपूर – 151

  4. पुणे – 162

  5. ठाणे – 131

  6. अहमदनगर – 68

  7. नाशिक – 122

  8. पिंपरी-चिंचवड – 128

  9. औरंगाबाद – 113

  10. वसई-विरार – 115

  11. कल्याण-डोंबिवली – 122

  12. नवी मुंबई – 111

  13. अकोला – 80

  14. अमरावती – 87

  15. लातूर – 70

  16. नांदेड-वाघाळा – 81

  17. मीरा-भाईंदर – 96

  18. उल्हासनगर – 78

  19. चंद्रपूर – 66

  20. धुळे – 74

  21. जळगाव – 75

  22. मालेगाव – 84

  23. कोल्हापूर – 92

  24. सांगली-मिरज-कुपवाड – 78

  25. सोलापूर – 113

  26. इचलकरंजी – 76

  27. जालना – 65

  28. पनवेल – 78

  29. परभणी – 65

या निवडणुकांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधींची निवड होऊन प्रशासनाला नवसंजीवनी मिळणार आहे.