पुणे कोथरूड प्रकरण : पोलिसांवर आरोप करणाऱ्या मुलींवरच गुन्हा; नेमकं काय घडलं?

पुणे (कोथरूड) : कोथरूड पोलिसांवर मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या तीन मुलींवरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या मुलींसह श्वेता पाटील आणि आणखी दोघांसह एकूण पाच जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा (कलम 132) गुन्हा बंडगार्डन पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.

हे प्रकरण १ ऑगस्ट रोजी उघडकीस आले. तिन्ही मुलींनी पोलिसांवर अत्यंत आक्षेपार्ह आणि जातीवाचक शब्दांत शिवीगाळ करण्यात आली, असा गंभीर आरोप केला होता. ‘तुम्ही महारा मांग्याच्या पोरी आहात, किती मुलांसोबत झोपलेत, लेसबियन आहात का?’ अशा प्रकारचे अपमानास्पद प्रश्न पोलिसांनी विचारल्याचा आरोप मुलींकडून करण्यात आला होता.

या आरोपांवर कारवाई व्हावी, यासाठी मुली व त्यांचे सहकारी – श्वेता पाटील, परिक्रमा खोत, अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर यांच्यासह तब्बल ५०-६० जणांनी पुणे पोलिस आयुक्तालयासमोर ३ ऑगस्ट रोजी सकाळी १० पासून रात्री ३ वाजेपर्यंत ठिय्या दिला होता. या वेळी आमदार रोहित पवार, सामाजिक कार्यकर्त्या अंजली व सुजात आंबेडकर देखील उपस्थित होत्या, मात्र त्यांच्यावर कोणताही गुन्हा नोंदलेला नाही.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करूनही मुलींच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य आढळले नसल्याचं कळवलं. पोलिसांनी याबाबत दिलेल्या पत्राची प्रती श्वेता पाटील यांनी पोलिसांसमोर फाडूनही टाकली. उपस्थित मुलींना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असता कोणतीही ताजी इजा किंवा जखम आढळली नाही, असं वैद्यकीय अहवालात नमूद आहे.

शेवटी, ठिय्या आणि पोलिसांची कागदपत्रे फाडल्याच्या प्रकारामुळेच श्वेता पाटीलसह इतर पाच जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी आदोलनकर्त्यांची मागणी असली तरी पोलिसांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत अजूनतरी कोणतीही कारवाई झालेली नाही.