पुरंदर विमानतळाबाबत मोठी बातमी…

पुणे : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला अपुरा असल्याने तो वाढवावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली आहे. या संदर्भात पवार यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी चर्चा केली असून, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

शनिवारी (दि. १६) पुण्यातील साखर संकुल येथे शेतकरी प्रतिनिधींची पवार यांच्यासोबत बैठक झाली. या वेळी २५ ते ३० शेतकरी उपस्थित होते. भूसंपादन मोबदला अपुरा असल्याचे निदर्शनास आणून देत शेतकऱ्यांनी केवळ आर्थिक परतावा नव्हे, तर पुनर्वसनाची स्पष्ट हमी व ठोस धोरण जाहीर करण्याची मागणी केली. सरकारने एरोसिटी प्रकल्पात विकसित भूखंड देण्याचा प्रस्ताव मांडला असला तरी त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असल्याचेही या बैठकीत व्यक्त करण्यात आले.

या चर्चेनंतर पवार म्हणाले की, “शेतकऱ्यांचे म्हणणे रास्त असून याबाबत मी लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करीन.”

पुरंदर विमानतळ प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेला असून त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी वाढत आहे. आता शरद पवार यांसारख्या ज्येष्ठ नेत्याने या प्रश्नात लक्ष घातल्याने राज्य सरकारवर तोडगा काढण्याचा दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पासाठी वनपुरी, कुभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, पारगाव मेमाणे आणि खानवडी या गावांतील जमिनी संपादित होणार आहेत. एकूण १३,३०० खातेदारांपैकी २,४७१ शेतकऱ्यांनी हरकती नोंदवल्या असून, जून महिन्यात प्रशासनाने त्यांची सुनावणी केली आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी स्वेच्छेने जमिनी देण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.