ही आहे महाराष्ट्रातील ‘‘निष्ठावान नेत्यांची यादी’’ : बदलत्या राजकारणातही ज्यांनी पक्षनिष्ठा सोडली नाही त्यांचे कौतुक तर करायलाच हवे!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वैचारिक गोंधळाचे वातावरण आहे. सत्ता आणि खुर्चीच्या राजकारणामुळे अनेक नेते एकमेकांविरुद्ध उभे ठाकत आहेत, पक्षफुटी घडवत आहेत, तर काही सत्तेच्या लाटेशी जुळवून घेत आहेत. मात्र, या सगळ्या राजकीय दलदलीतही काही नेते असे आहेत ज्यांनी आपली निष्ठा, भूमिका वाचवली असून, कोणत्याही अडचणीच्या काळात आपल्या पक्षाची आणि नेत्यांची साथ सोडलेली नाही. अशा १० निष्ठावान नेत्यांची सविस्तर माहिती खाली दिली आहे:

1. संजय राऊत (शिवसेना – उद्धव ठाकरे गट)

संजय राऊत हे स्पष्टवक्तेपणा आणि कडव्या भूमिकेसाठी ओळखले जातात. पत्रकारितेपासून राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याची भूमिका कायम ठेवली. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या काळात, ईडी-सीबीआयच्या चौकशी, जेलवारी अशा कठीण प्रसंगांमध्येही त्यांनी पक्ष सोडला नाही आणि इतर पक्षांकडून आलेल्या ऑफर नाकारल्या.

2. जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट)

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली, तेव्हापासून जितेंद्र आव्हाड हे पक्षात आहेत. अजित पवार यांनी पक्षात फूट घातली, तरीही आव्हाड शरद पवारांच्या सोबतच राहिले. त्यांनी वैचारिक निष्ठा आणि व्यक्तिगत नातेसंबंधात कधीही तडजोड केली नाही.

3. सुधीर मुनगंटीवार (भाजप)

विदर्भातील भाजपचे ज्येष्ठ नेते असून अनेक वर्ष सत्तेबाहेर राहिले. त्यांना विरोधी पक्षांनी आकर्षक ऑफर दिल्या तरी त्यांनी कधीच भाजप सोडला नाही. 2024 लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला तरी पक्षाशी निष्ठा कायम ठेवली.

4. बाळासाहेब थोरात (काँग्रेस)

आपल्या कारकिर्दीची सुरुवात अपक्ष उमेदवार म्हणून केल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि नंतर 8 वेळा आमदार म्हणून निवडून आले. काँग्रेसवर संकटाचे सावट असतानाही त्यांनी पक्ष सोडला नाही. अनेक आरोप झाले तरी त्यांनी निष्ठा राखली.

5. अनिल परब (शिवसेना – उद्धव गट)

कॉलेज जीवनापासूनच शिवसेनेत सक्रीय असलेले परब हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही ते पक्षाशी ठाम राहिले. ईडी-सीबीआय चौकशींना सामोरे गेल्यानंतरही त्यांनी आपली निष्ठा कायम ठेवली.

6. विनोद तावडे (भाजप)

2019 मध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असूनही त्यांना तिकीट नाकारले गेले, प्रदेशाध्यक्षपदासाठीही त्यांना डावलले गेले. तरीही त्यांनी भाजपसोबत आपली बांधिलकी कायम ठेवली आणि पक्षकार्य करत राहिले.

7. सतीश (बंटी) पाटील (काँग्रेस, कोल्हापूर)

कोल्हापूरमध्ये काँग्रेसची नव्याने उभारणी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. राजकीय दबाव, आरोप आणि एकाकी संघर्ष असूनही त्यांनी काँग्रेसची साथ सोडलेली नाही.

8. अनिल देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट)

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवारांसोबत दीर्घ काळ पक्षकार्य केले. गंभीर आरोप, राजीनामा आणि तुरुंगवास अशा परिस्थितीतही त्यांनी इतर पक्षांकडून आलेल्या ऑफर्स नाकारल्या आणि निष्ठा राखली.

9. गिरीश महाजन (भाजप)

भाजपमध्ये ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाणारे महाजन हे आमदार ते मंत्री असा प्रवास भाजपमध्येच करत आले आहेत. आजही ते पक्षात महत्वाची भूमिका बजावत आहेत.

10. नितीन सरदेसाई (मनसे)

राज ठाकरे यांचे जवळचे मित्र असलेल्या सरदेसाई यांनी 2009 मध्ये आमदारकी मिळवली. मनसेच्या पडत्या काळातही त्यांनी पक्ष आणि राज ठाकरे यांच्याशी निष्ठा राखली आहे.

राजकीय बदल, पक्षफुटी, सत्ता संघर्ष अशा काळातही काही नेते वैयक्तिक स्वार्थ न पाहता आपला पक्ष, विचारधारा आणि नेत्याशी प्रामाणिक राहतात. त्यांची ही निष्ठा म्हणजे राजकारणातील मूल्यांची आठवण करून देणारी एक प्रेरणा आहे.