हिंदु धर्म आणि देवता यांच्यावर श्रद्धा आहे, अशांनाच मंदिरसेवेत घ्या ! – सनातन संस्था
श्री शनिशिंगणापूर हे देवतेच्या कृपेचा अनुभव देणारे जागृत तीर्थक्षेत्र आहे. अलीकडेच या ठिकाणी पवित्र चौथऱ्याशी संबंधित एका कृतीमुळे वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने काही कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करून मंदिराची सात्त्विकता टिकवण्यासाठी योग्य निर्णय घेतला, हे निश्चितच अभिनंदनीय आहे. हिंदूंची मंदिरे ही श्रद्धास्थाने असून ज्यांची हिंदु धर्म आणि देवता यांच्यावर श्रद्धा आहे, अशांनाच मंदिरसेवेत घ्यावे, अशी भूमिका सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी मांडली आहे.
‘मंदिर’ म्हणजे केवळ वास्तू नव्हे, तर ते देवतेचे सान्निध्य लाभणारे जागृत स्थान आहे. अशा ठिकाणी सेवा करणाऱ्यांची वृत्ती, श्रद्धा आणि जीवनशैली या सर्व बाबी धार्मिक दृष्टिकोनातून सात्त्विक असाव्यात, ही काळाची गरज आहे.
मंदिर प्रशासनाने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना सनातन धर्माचे पालन करणारा, धर्मावर श्रद्धा असणारा, सर्व कृती करतांना पावित्र्य आणि शुचिर्भूतता पाळणारा कर्मचारी नव्हे, तर सेवक नेमायला हवा. सनातन धर्मावर श्रद्धा नसलेल्या किंवा नास्तिक असलेल्या व्यक्तींना धार्मिक व्यवस्थापनांमध्ये घेणे अयोग्य आहे. तसे करण्याची काही आवश्यकता नाही. मंदिरांमध्ये देवाची सेवा करायची असते, ज्यांची श्रद्धाच नाही, ते सेवा काय करणार? त्यामुळे केवळ शनिशिंगणापूरच नव्हे, तर सर्वच देवस्थानांनी ही भूमिका घेऊन सेवकांची नियुक्ती करावी, अशी मागणी श्री. वर्तक यांनी केली.