वारीतील पुरोगाम्यांची घुसखोरी रोखण्याचा वारकऱ्यांचा निर्धार!
पुणे (सासवड) : सासवड येथे वारकरी संप्रदाय संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित वारकरी संत बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीस उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून हिंदूंना संघटित करून वारीतील पुरोगाम्यांच्या घुसखोरीचा तीव्र विरोध करण्याचा, तसेच हिंदु राष्ट्र स्थापण्याचा निर्धार व्यक्त केला. ही संत बैठक २३ जून रोजी गुरुकुल विद्यालय, पालखी तळाजवळ, सासवड, पुणे येथे संपन्न झाली.
या बैठकीस अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते ह.भ.प. महेंद्र महाराज म्हस्के, जोग वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे ह.भ.प. अविनाश महाराज देशमुख, अमरावतीचे ह.भ.प. पद्माकर महाराज देशमुख, तुळजापूर येथील महंत योगी मावजीनाथ महाराज, महंत इच्छागिरी महाराज, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते.
“आम्हाला राज्यघटना शिकवू नये, आम्ही त्यानुसारच वागतो!” – ह.भ.प. महेंद्र महाराज म्हस्के
वारी एकतेचा संदेश देते. त्यामुळे पुरोगामी मंडळींनी वारीच्या विरोधात कोणतेही विचार पसरवू नयेत. आम्ही वारीतील पुरोगाम्यांच्या घुसखोरीविरोधात मोहीम उघडली आहे. आम्ही राज्यघटनेनुसारच वागतो. आम्हाला संविधान समता दिंडीवाल्यांनी आम्हाला राज्यघटना शिकवण्याची गरज नाही. वारकरी जातीभेद वा धर्मभेद करत नाहीत; पण जेव्हा धर्म विचारून हिंदूंवर गोळ्या झाडल्या जातात, तेव्हा आम्हाला विरोध करावा लागतो.
“वारीतील इतर धर्मीयांच्या प्रचार-प्रसाराला चोख उत्तर देणार!”– ह.भ.प. पद्माकर महाराज देशमुख
‘संविधान समते दिंडी’मध्ये सहभागी काही मंडळी मनुस्मृती जाळण्याचे आवाहन करतात. मनुस्मृती आम्हा हिंदूंसाठी राज्यघटनेइतकीच महत्वाची आहे. ख्रिस्ती व मुसलमान वारीत घुसखोरी करून धर्मप्रसारासाठी पत्रके वाटतात. भविष्यात असे घडल्यास आम्ही त्यास चोख प्रत्युत्तर देऊ.
“श्री तुळजाभवानी संस्थानला कोट्यवधींचे अनुदान, पण भक्तांना लाभ काय?” – महंत मावजीनाथ महाराज
वारकरी संत बैठकीत मंदिरांवरील विविध आघातांविरुद्ध आवाज उठवताना त्यांनी सांगितले की, श्री तुळजाभवानी संस्थानला कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळते, तरीही भक्तांसाठी कोणतीही सुविधा नाही. कुलाचार आणि कुळधर्म पार पाडण्यासाठी मंदिर परिसरात योग्य व्यवस्था नाही. मंदिरांच्या माध्यमातून हिंदू धर्माचे कार्य व्हावे यासाठी भक्तांनी कृतीशील व्हावे.
“वारकऱ्यांनी भक्तीसमवेत आता शक्तीही दाखवण्याची वेळ आली आहे!” – सुनील घनवट
धर्मांध ख्रिस्ती व मुसलमान वारीमध्ये येऊन फसवून धर्मप्रसार करतात. ख्रिस्ती पत्रके वाटली जातात, ‘अल्लाविना कुणी देव नाही’ असे उर्दू भाषेतील मोठे फलक वारीच्या काळात पालखी मुक्कामाजवळ लावले जातात. त्यामुळे काळाच्या ओघात भक्तीबरोबर शक्तीही दाखवावी लागेल. दरवर्षी सुमारे १८ लाख हिंदू धर्मांतरित होतात. अहिल्यानगर येथे ख्रिस्ती मंडळी ‘मतमाऊली’ वारी काढतात, ‘येशूनाम सप्ताह’ साजरा करतात. याविरोधात वारकऱ्यांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. देशभरातील साडेचार लाख मंदिरांपैकी दीड लाख मंदिरं महाराष्ट्रात असून ती सरकारच्या अधिपत्याखाली आहेत; मात्र एकही मशीद किंवा चर्च सरकारच्या नियंत्रणात नाही. रायगड येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रशांत कांबळे उर्फ सुनील जगताप हे कार्यकर्ते नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. त्यांना पुणे आतंकवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. तरीही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक वारीत सहभागी होत आहेत, ही गंभीर बाब आहे.
“जे आपल्या धर्माला मानत नाहीत, त्यांच्याकडून खरेदी कशासाठी?” – महंत इच्छागिरी महाराज
हिंदूंनी आता जागरूक व्हावे. वारीत धर्मांध मंडळी त्यांचा धर्म महत्त्वाचा असल्याचे फलक लावतात. खरं वारकरी असल्यास तो असे फलक काढून टाकेल. जे आपल्या धर्माला मानत नाहीत, त्यांच्याकडून खरेदीही का करावी?
“वारकऱ्यांनी हिंदु धर्म टिकवला असताना, त्यांना हिंदू नव्हते असे म्हणणे हा खोटा प्रचार!” – स्वामी भारतानंद सरस्वती महाराज
वारकरी हे खरे सनातनी हिंदू आहेत. त्यांनीच हिंदू धर्म टिकवून ठेवला आहे. असे असताना काही मंडळी वारकऱ्यांना हिंदू नाहीत, असा खोटा प्रचार करतात. वारकरी संतांमध्येही जातिभेद निर्माण केला जात आहे. ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ या अभंगाऐवजी ‘नामदेवे रचला पाया’ असे म्हणणे ही दुटप्पी भूमिका आहे. काही ब्रिगेडी संघटना समाजात फूट पाडत आहेत. आळंदीत १६ जणांचे धर्मांतर झाले. पडघा बोरीवली गाव ‘अल-शाम’ म्हणून घोषित केले जाते आणि भारताची राज्यघटना लागू नसल्याचे खुलेआम सांगितले जाते, तरीही ‘संविधान समता दिंडी’वाले याविरोधात काहीच का बोलत नाहीत? अशा मंडळींचे वारीत काय काम आहे?