पहलगाममधील हल्ला म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वावर आणि हिंदू समाजावर झालेले थेट आक्रमण – डॉ. श्री. निलेश लोणकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
पारगाव (सा.मा.), दौंड (जिल्हा पुणे) – उरी, पठाणकोट, पुलवामा आदी आतंकवादी आक्रमणांना चोख उत्तर दिल्यानंतरही असे हल्ले थांबायला सिद्ध नाहीत. हे काश्मीरच्या पहलगाममधील भीषण आतंकवादी आक्रमणामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. येथे आतंकवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर त्यांचा धर्म विचारून २७ जणांची निर्दयीपणे हत्या केली. यात एका नवविवाहितेसमोरच तिच्या पतीला मारण्यात आले. ही घटना आतंकवाद्यांची केवळ क्रूरताच नव्हे, तर भारताच्या सार्वभौमत्वावर आणि हिंदू समाजावर झालेले थेट आक्रमण दर्शवते. हे जिहादी आक्रमण काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचाच पुढचा भाग आहे. याचा केवळ निषेध न करता भारत सरकारने जिहादी अतिरेक्यांना आणि त्यांच्या भारतातील हस्तकांवर कठोर सैन्य कारवाई करावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे डॉ. श्री. निलेश लोणकर यांनी केली. 24 एप्रिल या दिवशी छत्रपती संभाजी महाराज चौक, पारगाव (सा.मा.), दौड, पुणे येथे सकाळी 9 ते 11 या वेळेत झालेल्या आंदोलनावेळी ते बोलत होते.
डॉ. श्री. निलेश लोणकर पुढे म्हणाले की, काश्मीर खोऱ्यामध्ये व्यापक ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवून अतिरेक्यांचा बीमोड करावा, ज्या परिसरातून सतत अतिरेकी हल्ले होत आहेत, तेथे कायमस्वरूपी लष्करी तळ उभारण्यात यावेत. काश्मीरमधील उरलेले हिंदू पर्यटक, व्यावसायिक आणि हिंदू पंडित यांचे जीवित रक्षण करण्यासाठी विशेष सुरक्षा आराखडा लागू करण्यात यावा.
या वेळी पारगाव (सा.मा.) चे माजी उपसरपंच श्री. सोमनाथ आबा ताकवणे, केडगाव येथील स्वामी समर्थ पोलीस अकॅडमीचे श्री. संदीप टेंगले सर, कडेठाण येथील श्री. गणेश दिवेकर, माजी सैनिक दिपक शेळके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
पारगाव (सा.मा.) गावचे सरपंच श्री. सुभाष तात्या बोत्रे पारगाव (सा.मा.) गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री. किसन नाना जगदाळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री. शामराव आबा ताकवणे यांनीही आंदोलनाला उपस्थित राहून मागण्यांना पाठिंबा दर्शविला.