Bacchu Kadu सरकारला नागरिकांच्या गरजा महत्त्वाच्या नाहीत : बच्चू कडू

Bacchu Kadu सरकारला नागरिकांच्या गरजा महत्त्वाच्या नाहीत : बच्चू कडू

रायगड | दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आणि प्रहार जनशक्ती पार्टी यांच्या वतीने माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली रायगडाच्या पायथ्याशी तीन दिवसांचे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी हे आंदोलन होत असून, राज्यभरातून दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

यावेळी आंदोलनाचे संयोजक व प्रहार जनशक्ती पार्टीचे सचिन साळुंखे, ओंकार साळुंखे, प्रहार अपंग क्रांती संस्थेचे महाराष्ट्र सचिव सुरेश मोकळ, राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव, रायगड जिल्हा अध्यक्ष सुनील गणबोडे, महाराष्ट्र संपर्कप्रमुख रामदास खोत, अभियान प्रमुख महेश बडे आदी उपस्थित होते. राज्यभरातील दिव्यांग मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत.

यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, “सध्याच्या सरकारला नागरिकांच्या मूलभूत गरजांची काहीच पर्वा नाही. धर्म आणि जातीच्या राजकारणाने देश आणि राज्यात परिस्थिती बिघडली आहे. औरंगजेबाने तलवारीच्या टोकावर लोकांना मारले, पण आजचे सत्ताधारी चुकीच्या धोरणांमुळे लोकांचे बळी घेत आहेत. औरंगजेबाच्या काळात जितके लोक मारले गेले नसतील, त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.”

MNS Pune : बाणेर भागातील ड्रेनेज समस्या गंभीर : मनसेचा इशारा

ते पुढे म्हणाले, “दिव्यांगांना मागील चार महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही, त्यामुळे त्यांचे जगणे कठीण झाले आहे. सरकारने कोणतीही दखल घेतलेली नाही. शेतकऱ्यांना ना कर्जमाफी मिळत आहे, ना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव. त्यामुळे शेतकरीही अडचणीत आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात सामान्य नागरिकांसाठी कोणतीही विशेष तरतूद करण्यात आलेली नाही, केवळ अनुदान कपातीचे धोरण आखले जात आहे. दिव्यांग मंत्रालयासाठी १४०० कोटींची तरतूद केली, पण त्यातील १२०० कोटी फक्त वेतनावर खर्च होत आहेत. मग उर्वरित निधीचा वापर दिव्यांग कल्याणासाठी कसा होणार?”

बच्चू कडू यांनी माध्यमांनाही प्रश्न विचारला. “औरंगजेबाच्या कबरीबाबत सातत्याने चर्चा होते, पण राज्यात सामान्य लोकांचे हाल होत आहेत, त्यावर कोणी बोलत नाही. माध्यमांनी निरर्थक गोष्टींवर भर देण्याऐवजी गरिबांच्या अडचणींवर लक्ष केंद्रित करावे.”

तसेच ते म्हणाले, “राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात दंगल होते, आणि तरीही ते यावर काहीच बोलत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.”

दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या मागण्या

  • या आंदोलनात दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेतः
  • दिव्यांगांना दरमहा ६,००० रुपये मानधन मिळावे.
  • प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारावे.
  • दिव्यांगांसाठी राष्ट्रीय बँक निधी आणि स्वयंरोजगार धोरण लागू करावे.
  • दिव्यांग उद्योजकांसाठी विशेष योजना आणावी.
  • अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी ५% निधी राखीव ठेवावा.
  • शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि योग्य बाजारभाव मिळावा.
  • २३ मार्च रोजी शहीद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर देखील आयोजित करण्यात आले आहे.