‘स्वयंघोषित विचारवंतांचे उदात्तीकरण का?’ – विशेष परिसंवाद !
कॉ. पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर या तथाकथित पुरोगाम्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये तपास यंत्रणांवर मोठा दबाव टाकण्यात आला. अन्वेषण यंत्रणांनी तपास काय केला, याकडे लक्ष न देता, केवळ वारंवार सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली जात होती. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात ५ तरुण, कॉ. पानसरे हत्या प्रकरणात १२ तरुण, गौरी लंकेश हत्या प्रकरणात १८ तरुण, तर कलबुर्गी हत्या प्रकरणात ६ तरुणांना अटक करण्यात आली. या सर्वांना जामीन मिळू न देता त्यांना कारागृहातच सडवण्याचे काम पुरोगामी मंडळी करत होती. महाराष्ट्रात सनातन संस्था ही एक आध्यात्मिक संस्था असूनही, तिला आतंकवादी संस्था ठरवण्यासाठी प्रचार करून खोटे ‘नॅरेटिव्ह’ तयार करण्यात आले. पुरोगाम्यांनी झुंडशाहीच्या माध्यमातून सनातन संस्थेचा बळी घेण्याचा प्रयत्न केला. विशेषतः, कॉ. पानसरे हत्या प्रकरणात न्यायाची मागणी करणार्या पानसरे कुटुंबीयांनीच खटला चालू नये यासाठी सर्वाधिक प्रयत्न केल्याचा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी केला. ते ‘स्वयंघोषित विचारवंतांचे उदात्तीकरण का?, कॉम्रेड्सच्या हत्या आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती!’ या विषयावरील ऑनलाईन विशेष परिसंवादात बोलत होते.
कॉ. पानसरे यांच्या विचारांचे खरे स्वरूप काय? – अधिवक्ता संजीव पुनाळेकर
या परिसंवादात ‘हिंदु विधीज्ञ परिषद’चे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर म्हणाले, ‘‘कॉ. पानसरे यांनी माजी पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ यांच्या ‘हू किल्ड करकरे?’ या पुस्तकाचा प्रचार केला. या पुस्तकात भारतीय गुप्तचर यंत्रणांवर संशय व्यक्त करून, कसाबसारख्या आतंकवाद्यांना समर्थन देण्याचा प्रयत्न होता. मग अशा पुस्तकाचे प्रचारक असलेले कॉ. पानसरे निश्चित कोणत्या विचारांचे होते? त्याचप्रमाणे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संस्थेला परदेशातून निधी मिळत असल्याचा आरोप आहे. त्यांच्या ट्रस्टमध्ये चालणार्या घराणेशाहीच्या विरोधात त्यांचेच कार्यकर्ते अविनाश पाटील यांनी बंड केले, पण यावर कोणीही चर्चा करत नाही. दाभोलकर यांच्या ट्रस्टमध्ये घोटाळे झाल्याचा उल्लेख वारंवार होत असूनही त्याची कधीही चौकशी झाली नाही. डॉ. दाभोलकर किंवा कॉ. पानसरे कोणत्या व्यवस्थेविरोधात लढत होते, हे कधीही स्पष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांचे पुरोगामीत्व बेगडी होते.’’
देशद्रोह्यांना पाठिंबा, तर हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न! – श्री. रमेश शिंदे
पुरोगामी सातत्याने कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्या म्हणजे भारतीय घटनेवर आक्रमण असल्याचे भासवतात. परंतु, दुसरीकडे देशावर आक्रमण करणार्या जिहादी कसाबपासून याकूब मेमनपर्यंत प्रत्येकाला वकील उपलब्ध करून दिला जातो; मात्र कोल्हापूर येथे दबाव निर्माण करून हिंदुत्वनिष्ठांचा खटला स्थानिक वकील चालवणार नाहीत, असा प्रस्ताव मंजूर केला जातो. आतंकवाद्यांसाठी मानवाधिकार आहेत; पण हिंदुत्वनिष्ठांसाठी नाहीत का? देशविरोधी कारवाया करणार्या शरजीलला जामीन मिळावा म्हणून गळे काढले जातात; पण हिंदुत्वनिष्ठांना मात्र आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे देशद्रोही आणि गद्दारांना पाठिंबा देत हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवण्याचे हे साम्यवादी षड्यंत्र आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी नमूद केले.