काश्मीरमध्ये हिंदू नरसंहार चालूच; आता बंगालची वाटचालही काश्मीरच्या दिशेने !

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा द्वितीय दिवस !

काश्मीरमध्ये हिंदू नरसंहार चालूच; आता बंगालची वाटचालही काश्मीरच्या दिशेने !

      काश्मीर येथून जरी कलम ३७० हटवण्यात आले असले, तरी आजही तिथे ‘डोमीसाईल प्रमाणपत्रा’च्या  नियमावलीमुळे काश्मीरच्या बाहेरील अन्य कुणीही जमीन खरेदी करू शकत नाही. काश्मीरमधील हिंदूंचा वंशविच्छेद आजही थांबलेला नाही. काश्मीरचे केवळ चांगले चित्र पर्यटकांच्या समोर मांडण्यात येते; मात्र तेथील भयावह स्थिती कुणीच मांडत नाही. जर भारतात लोकशाही व्यवस्था आहे, तर काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद मान्य का केला जात नाही? त्यामुळे काश्मीरमध्ये जेव्हा पनून काश्मीरच्या माध्यमातून सनातन धर्माचा प्रचार चालू होईल, तेव्हा ते हिंदु राष्ट्राचे पहिले पाऊल असेल, असे प्रतिपादन यूथ फॉर पनून कश्मीर, दिल्लीचे अध्यक्ष विठ्ठल चौधरी यांनी केले. ते ‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन कसे होईल’, यावर बोलत होते. ते ‘श्रीरामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या दुसर्‍या दिवशी बोलत होते.

साम्यवाद्यांच्या राजवटीत बंगालची अपरिमित हानी ! – स्वामी निर्गुणानंद पुरी, बंगाल

       साम्यवाद्यांच्या राजवटीत बंगालमध्ये भारतीय परंपरा आणि संस्कृती यांची न भरून येणारी हानी झाली. या कालावधीत हिंदू समाजाची स्थिती खूप वाईट झाली. हिंदूंनी मंदिरात जाणे बंद केले. आज बंगालमध्ये हिंदूंची अनेक गावे रिकामी होत आहेत. तेथील आदिवासी, अनुसूचित जाती आणि जमाती यांना हिंदु धर्मापासून दूर केले जात आहे. त्यांना ते हिंदू नाहीत, असे सांगितले जात आहे. हिंदू समाजात फूट पाडली जात आहे. यावर उपाय म्हणजे आपली गावे स्वयंपूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, तसेच हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांची हिंदु धर्म, मंदिरे यांप्रतीची संवेशनशीलता वाढवली पाहिजे, असे प्रतिपादन बंगाल येथील ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे कोषाध्यक्ष स्वामी निर्गुणानंद पुरी यांनी केले. ते ‘बंगाल राज्यात हिंदूंचे संघटन आणि आव्हाने’ यावर बोलत होते.

प्रत्येक मंदिरामध्ये गोशाळा चालू झाल्यास गोरक्षण होईल ! – शेखर मुंदडा, अध्यक्ष, महाराष्ट्र गो सेवा आयोग

     गोरक्षण करायचे असेल, तर प्रत्येक मंदिरात गोशाळा चालू करावी. इस्कॉनने महाराष्ट्रात २ गोशाळा चालू केल्या आहेत. अन्य काही देवस्थानांसोबत गोशाळा चालू करण्याविषयी आमचे बोलणे झाले आहे. असे केल्यास निश्चित गायीचे रक्षण होईल, असे प्रतिपादन ‘महाराष्ट्र गो सेवा आयोगा’चे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा यांनी केले.

      या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेल द्वारेही केले जात आहे.