महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण : शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत; कोणते आहेत हे किल्ले वाचा यादी

मुंबई : महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ले—रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे.

मराठा लष्करी पराक्रमाचा जागतिक सन्मान –

या किल्ल्यांचा समावेश ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ (Maratha Military Landscapes) या संकल्पनेअंतर्गत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यात आला आहे. सतराव्या ते एकोणिसाव्या शतकात बांधलेले हे किल्ले मराठा सैन्याच्या असामान्य रणनीती, अभेद्य तटबंदी आणि स्थापत्यकौशल्याचे प्रतीक आहेत. युनेस्कोच्या यादीत भारतातील एकूण 42 वारसा स्थळांचा समावेश आहे, यापैकी महाराष्ट्रातील अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईतील व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको एन्सेंबल आणि एलिफंटा लेणी यांचा यापूर्वीच समावेश होता. आता शिवरायांच्या 12 किल्ल्यांनी या यादीत स्थान मिळवले आहे.

पुण्यातील दोन नामांकित हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार : एकात सूपमध्ये आढळले झुरळ तर कॅफेच्या बनमस्कामध्ये आढळली काच

किल्ल्यांची यादी –

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या किल्ल्यांमध्ये खालील किल्ल्यांचा समावेश आहे:

रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, जिंजी.

मुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त –

ऐतिहासिक ! अभिमानास्पद !! गौरवशाली क्षण !!!

आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना महाराष्ट्र सरकारचा मानाचा मुजरा !!!! महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, शिवप्रेमींचे मन:पूर्वक अभिनंदन… छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत! मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे.

यात महाराष्ट्रातील 11 किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. स्वराज्यनिर्मिती आणि ते टिकविण्यासाठी महाराजांनी हे किल्लेवैभव उभारले. शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही. माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दीनीतीने रचलेला भाग आहे. हेच ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ आहे. हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले. सर्वप्रथम मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अतिशय मनापासून आभार मानतो.

त्यांनी दिलेला पाठिंबा आणि केंद्र सरकारकडून सक्रिय सहभाग ही अत्यंत मोलाची बाब ठरली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयाने यात मोठी मदत केली. मी स्वत: विविध राजदुतांशी संपर्क केला. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही वेळोवेळी साथ दिली. माझे सहकारी मंत्री आशिष शेलार यांनी स्वत: जाऊन युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेतली. तेथे तांत्रिक सादरीकरण केले.

माझ्या कार्यालयातील अपर मुख्य सचिव विकास खारगे तसेच भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे हेमंत दळवी त्यात सहभागी होते. अनेकांचे हातभार लागले आणि त्यातून देशभरातील शिवभक्तांसाठी आजचा आनंदाचा क्षण साकारला गेला आहे. मी पुन:श्च महाराष्ट्रातील सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो.

॥ छत्रपती शिवाजी महाराज की जय ॥