Ajit Pawar Plane Crash : अजितदादांचा अपघात या 3 कारणांमुळे, चौकशी अहवालातून सर्वात मोठी माहिती समोर
बारामती : २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले होते. या घटनेनंतर महिनाभराने विमान अपघात तपास ब्युरोने (AAIB) २२ पानी प्राथमिक चौकशी अहवाल जाहीर केला असून त्यात अपघातामागील संभाव्य कारणांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
अहवालानुसार, विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी एका झाडाला धडकले आणि त्यानंतर कोसळले. अपघात एका एकमेव कारणामुळे नव्हे, तर हवामान, पायाभूत सुविधा आणि ऑपरेशनल निर्णय यांच्या संयोगामुळे घडल्याची शक्यता तपासात नमूद करण्यात आली आहे. अंतिम निष्कर्ष मात्र कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) यांच्या सविस्तर विश्लेषणानंतरच स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
बारामती विमानतळावर स्वतंत्र हवामान (MET) सुविधा नसल्याचा उल्लेख अहवालात आहे. टॉवरकडून ३,००० मीटर दृश्यमानता सांगितली गेली असली तरी प्रत्यक्षात अपघातावेळी ती सुमारे २,००० मीटरपर्यंत घसरली होती. व्हिज्युअल फ्लाइट रूल्स (VFR) ऑपरेशन्ससाठी किमान ५,००० मीटर दृश्यमानता आवश्यक असते.
VFR मर्यादेपेक्षा कमी दृश्यमानतेत लँडिंगचा प्रयत्न हा जोखीम घटक ठरू शकतो, असे अहवालात नमूद आहे. कमी दृश्यमानता, दृश्यभ्रम (visual illusion) आणि टेबल-टॉप धावपट्टी या घटकांच्या एकत्रित परिणामामुळे अपघात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
प्राथमिक अहवालात पुढील मुद्दे संभाव्य कारणे म्हणून नमूद करण्यात आले आहेत:
-
VFR किमान मर्यादेपेक्षा कमी दृश्यमानता
-
अनकंट्रोल्ड एअरफिल्डवरील अपुरी पायाभूत सुविधा
-
टेबल-टॉप रनवे व फिकट मार्किंग
-
मानवी घटक अथवा दृश्यभ्रम
-
MET माहितीची मर्यादित अचूकता
आतापर्यंत तांत्रिक बिघाडाचा थेट पुरावा आढळलेला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे CVR आणि FDR च्या सखोल तपासानंतरच अपघाताचे अंतिम कारण स्पष्ट होणार आहे.









