‘सुराज्य अभियाना’च्या पाठपुराव्याला यश : एसटीची राज्यभर ‘डीप क्लीनिंग’ मोहीम !

पण एसटीची मृतावस्थेत’ असलेली हेल्पलाईन कधी बोलणार – सुराज्य अभियानाचा सवाल

मुंबई – हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’ने एसटी डेपोच्या स्वच्छतेसाठी राज्यभरात केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. या अभियानाची दखल घेत राज्य सरकारने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियान सुरू केले; मात्र बसस्थानकाची स्वच्छता नियमितपणे राहण्यासाठी आता डेपो व्यवस्थापकांना दर १५ दिवसांनी स्थानकांचे सखोल स्वच्छता (डीप क्लीनिंग) करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो; मात्र बसस्थानकांचा परिसर चकाचक होत असला, तरी प्रवाशांसाठीची ‘संपर्क यंत्रणा’ आजही ‘मृतावस्थेत’ आहे. त्यामुळे १५ दिवसांनी होणाऱ्या ‘डीप क्लीनिंग’ मोहिमेत केवळ फरशी न पुसता, राज्यभरातील बंद पडलेली संपर्क यंत्रणा (हेल्पलाईन) चालू करून तिलाही उर्जितावस्था द्यावी, अशी आग्रही मागणी ‘सुराज्य अभियाना’ने केली आहे.

          एसटी प्रशासनाने नुकतेच स्वच्छतेबाबत सकारात्मक पाऊल उचलले आहे; परंतु ‘सुराज्य अभियाना’ने एका गंभीर विसंगतीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. अनेक बसस्थानकांवर चौकशी खिडकीवरील फोन उचलले जात नाहीत किंवा ते बंद असतात. प्रवाशांना गाड्यांच्या वेळा, बदल किंवा तक्रारींसाठी संपर्क साधायचा झाल्यास त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नाही. राज्यभरातून येत असलेल्या तक्रारींची नोंद घेत सुराज्य अभियानाने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव आणि अकोला या जिल्ह्यांतील २१ आगार व्यवस्थापकांना निवेदने देऊन ही परवड प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. सुराज्य अभियानाने या संदर्भात पाठवलेल्या ईमेलची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री सचिवालय (CMO) आणि एसटी प्रशासनाने राज्यातील ३१ विभागांना तातडीने त्रुटी सुधारण्याचे निर्देश दिले आहेत.

          याविषयी भूमिका मांडतांना सुराज्य अभियानाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. अभिषेक मुरकुटे यांनी म्हटले की, ‘‘प्रशासनाने आमच्या निवेदनाची दखल घेऊन ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ अभियान सुरू केले, ही स्वागतार्ह बाब आहे; मात्र सक्रीय हेल्पलाईनशिवाय ही मोहीम अपूर्ण आहे. प्रवाशांना जर एसटीशी संपर्कच साधता येत नसेल, तर त्या सौंदर्यीकरणाचा उपयोग काय? त्यामुळे १५ दिवसांनी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेत ‘संपर्क यंत्रणेची चाचपणी’ हा नियमच करावा. या ‘सेवा लेखापरीक्षणात’ (Service Audit) हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या सेवा पुस्तिकेत ‘नकारात्मक नोंद’ करण्यात यावी, अशी आमची आग्रही मागणी आहे.’’