राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा बिगूल वाजताच राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून अनेक पक्षांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) ला सलग धक्के बसत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता मुंबईतून मनसेसाठी आणखी एक मोठा धक्का समोर आला आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसे यांच्यात युती जाहीर झाली आहे. गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्तपणे या युतीची घोषणा केली होती. मात्र, युतीच्या घोषणेनंतर अवघ्या काही दिवसांतच मनसेच्या सरचिटणीस स्नेहल जाधव यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
वॉर्ड क्रमांक १९२ मधील उमेदवारी जाहीर करताना आपल्याला विश्वासात न घेण्यात आल्यामुळे आपण नाराज असल्याचे स्नेहल जाधव यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत १९९२-१९९७, १९९७-२००२ आणि २००२-२००७ अशा सलग तीन टर्ममध्ये त्यांनी या वॉर्डचे नगरसेविका म्हणून प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर २००७-२०१२ या कालावधीत त्यांच्या पतीनेही याच वॉर्डमधून नगरसेवक म्हणून विजय मिळवला होता. सलग चार टर्म प्रतिनिधित्व करणाऱ्या जाधव कुटुंबाला यंदा उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराजीचा उद्रेक झाला आणि अखेर पक्ष सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर झालेला हा राजीनामा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेषतः ठाकरे गटाशी युती जाहीर झाल्यानंतर ज्येष्ठ नेत्याचा असा निर्णय पक्षातील अंतर्गत एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. दरम्यान, राज्यातील विविध महापालिकांमध्ये युती-आघाड्यांचे राजकारण जोरात सुरू असून, अनेक इच्छुकांची तिकिटे कापली जात आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत पक्षांतर्गत नाराजीची नाट्ये आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









