आजपासून आचारसहिंता लागण्याची शक्यता; राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद; ३ महिन्यात ३ टप्प्यात धुरळा उडणार

राज्य निवडणूक आयोग आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार असून, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे आजपासूनच आचारसंहिताही लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयुक्त दिनेश वाघमारे या पत्रकार परिषदेस संबोधित करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील निवडणुका तीन टप्प्यांमध्ये घेण्याचा प्रस्ताव असून, संपूर्ण प्रक्रिया साधारण ८५ दिवसांपर्यंत चालेल.

  • नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका – अंदाजे २१ ते २५ दिवस

  • जिल्हा परिषद व पंचायत समित्या३० ते ३५ दिवस

  • महापालिका२५ ते ३० दिवस

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पूर्ण करणे बंधनकारक आहे. या निवडणुकांमध्ये ९ कोटींहून अधिक मतदार मतदान करणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

राज्यात एकूण

  • २८९ नगरपालिका

  • ३२ जिल्हा परिषदा

  • ३३१ पंचायत समित्या

  • २९ महापालिका यांच्या निवडणुका होणार आहेत.

नगरपालिका व नगराध्यक्षांचे प्रभाग आरक्षण जाहीर झाले असून, मतदार यादीही अंतिम झाली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांपासून प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी आरक्षण जाहीर असले तरी मतदार याद्या अद्याप अंतिम झालेल्या नाहीत. त्यामुळे या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.

महापालिकांच्या प्रभाग व महापौरांचे आरक्षण नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार आहे. तसेच ६ नोव्हेंबरला मतदार यादी प्रदर्शित होणार असल्याने महापालिकांच्या निवडणुका तिसऱ्या टप्प्यात घेणं निश्चित मानलं जात आहे.