‘आई स्वयंपाक करून ठेव’, म्हणत अक्षय घरातून गेला, तो पुन्हा परतलाच नाही, बेपत्ता तरुणाच्या शोधात मोठी माहिती समोर; महाराष्ट्र हादरला

अकोला : अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा अक्षय नागलकर हा तरुण 22 ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. त्याच्या बेपत्तेची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती आणि तीन दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. मात्र, या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. पोलिसांच्या तपासानंतर अक्षय नागलकर याची निर्घृण हत्या झाल्याचं उघड झालं आहे. ही हत्या पूर्व वैमनस्यातून केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

अक्षयचा शोध लागावा म्हणून त्याचे नातेवाईक आणि मित्रमंडळी दररोज डाबकी रोड पोलीस ठाण्यात जाऊन ठाण मांडून बसत होती. मात्र प्रत्येकवेळी “तपास सुरू आहे” एवढंच उत्तर मिळाल्यानं त्यांच्या मनात संताप आणि अस्वस्थता वाढली होती. या प्रकरणाची दखल घेत स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अक्षयचा शोध घेण्याची मागणी केली होती. अक्षयचे वडील सातत्याने “माझा मुलगा जिवंत आहे की त्याच्यावर काही अनर्थ घडला आहे, हे तरी स्पष्ट करा” अशी विनंती करत होते.

पण अखेर त्यांची भीती खरी ठरली. तपासात समोर आलं की, अक्षय नागलकरची हत्या त्याच्याच ओळखीच्या मित्रांनी केली आहे. एकूण आठ जणांनी ही हत्या केल्याची माहिती मिळाली असून, त्यापैकी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही हत्या जुन्या वादातून घडली.

22 ऑक्टोबरच्या संध्याकाळी पाचच्या सुमारास अक्षयने आईला “स्वयंपाक करून ठेव” असं सांगून घराबाहेर पाऊल टाकलं आणि तो पुन्हा परतलाच नाही. काही दिवसांनी समजलं की, त्याची चाकूने भोसकून हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह जाळून टाकण्यात आला. हत्या करण्यापूर्वी आरोपींनी अक्षयसह एका हॉटेलमध्ये जेवण केल्याचंही उघड झालं आहे.

तपासाच्या प्राथमिक निष्कर्षानुसार, अक्षय नागलकर याची हत्या झाल्याचं निश्चित झालं आहे. मात्र, पोलिसांनी दाखवलेला मृतदेह हा अक्षयचाच असल्याचं त्याच्या कुटुंबाला मान्य नाही. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी अक्षयच्या कुटुंबीयांनी केली आहे.