मधल्या सुट्टीत शेतात गेला अन् त्याने थेट मृत्यूला कवटाळलं, दहावीच्या मुलासोबत नेमकं काय घडलं?

वर्गशिक्षकांच्या ओरडण्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वसाडी गावात दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विवेक राऊत (वय अंदाजे १६) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

वसाडी येथील जय बजरंग विद्यालयात दहावीत शिकणारा विवेक शाळेत होता. काल (३० जून २०२५ रोजी) वर्गशिक्षक सूर्यवंशी यांनी त्याला काही प्रश्न विचारले. मात्र विवेक उत्तरे देऊ शकला नाही. यामुळे शिक्षकांनी त्याच्यावर राग व्यक्त करत, “तू अभ्यास करत नाहीस, हे मी तुझ्या आई-वडिलांना सांगेन,” असे म्हटले. या गोष्टीचा राग मनात धरून विवेकने मधल्या सुट्टीत गावाजवळील एका शेतात जाऊन गळफास लावून घेतला.

आत्महत्या करण्यापूर्वी विवेकने एक सुसाईड नोट लिहिली होती. त्यात त्याने स्पष्टपणे नमूद केले होते, “सूर्यवंशी या वर्गशिक्षकाने मला ओरडले, आई-वडिलांवरून बोलले, त्यामुळे मी फाशी घेत आहे!”

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पिंपळगाव राजा पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, संबंधित वर्गशिक्षक सूर्यवंशी यांना ताब्यात घेतले आहे. शाळा सुरू होऊन एक महिनाही उलटला नसताना घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.